Monday, 30 June 2014

मतकुणकीनं केली पाणी टंचाईवर मात : विहिरींचं पुनर्भरण केलं गावात

सोमवार, ३० जून, २०१४



सांगलीच्या दुष्काळी पट्टयातल्या तासगाव तालुक्यातील १३१६ लोकवस्तीच्या मतकुणकी गावानं गावातील २५ विहिरींचं पुनर्भरण केलं. गावात ५ वनराई बंधारे आणि २ सिमेंट बंधारे बांधले... शिवकालीन पाणी साठवण योजनेतून गावातील पाझर तलावाचे दुरुस्तीचे काम केले... या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून गावातील पाण्याची पातळी वाढली आणि गावाचा पाण्याचा प्रश्न सुटला. गाव पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत स्वंयपूर्ण करण्याचं काम ग्रामपंचायतीने केले...

असं खुपदा विचारलं जातं, इको व्हिलेज योजनेनं काय दिले?
इको व्हिलेज योजनेनं गाव विकासाचे भान दिले. या योजनेचं वेगळेपण असं की या योजनेतील निकष पुर्ण केल्याशिवाय अनुदान मिळत नाही. योजनेत सहभागी होणं आणि योजनेतील सगळे निकष पुर्ण करणं अनुदान मिळण्यासाठी गरजेचं आहे. त्यामुळेच योजनेत सहभागी होऊन राज्यातील अनेक गावांनी पाणी व्यवस्थापन आणि पाण्याच्या पुनर्वापराला गती दिली.

गावानं योजनेत २८१३ झाडं लावली. पाणी बचतीसाठी ही सगळी झाडं शेताच्या बांधावर आणि परसबागेत लावली. निर्माण होणाऱ्या सांडपाण्याला संकलित करून गावानं ठिबक सिंचनद्वारे या झाडांना पाणी देऊन वाढवलं.

इको व्हिलेज योजना गावात येईपर्यंत ग्रामपंचायतीची करवसुली एकदमच नगण्य असायची. मागील तीन वर्षांपासून ती ९५ ते १०० टक्क्यांच्या दरम्यान आहे. गाव इको व्हिलेज अंतर्गत तीन ही वर्षाच्या निकषाला पात्र ठरल्याने गावाला अनुदान ही मिळाले आहे. बक्षीसाच्या रकमेतून गावानं पिकअपशेड, स्मृतीउद्यान आणि सांडपाणी व्यवस्थापनाचे काम केले आहे.

गावातील सगळ्या कुटुंबाकडे आणि रस्त्यावर सी एफ एल बल्बचे दिवे आहेत. आठ सोलर दिवे आणि सीएफएल बल्बमुळे गावातील वीज बचत ५० टक्क्यांवर आली आहे. गावात प्लास्टिक बंदी तर आहेच घनकचरा व्यवस्थापनाची सोय देखील आहे. यापासून निर्माण होणारे खत योजनेत झालेल्या झाडांना देण्यात येत आहे.

गावात ७ कुटुंबाकडे बायोगॅस आहे. गावात घरटी शौचालय असून गावानं स्वच्छ गाव असल्याचा पुरस्कार देखील मिळवला आहे.
-डॉ. सुरेखा म. मुळे

No comments:

Post a Comment