Thursday, 12 June 2014

पर्यावरण संवर्धनासाठी बायोगॅस

गुरुवार, १२ जून, २०१४



पर्यावरण समतोलाच्या प्रमुख उद्देशाबरोबरच ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी आज तरी बायोगॅसला अनन्यसाधारण महत्व आहे. ग्रामीण जनतेची ही गरज डोळयासमोर ठेवून कोल्हापूर जिल्हा परिषदेने गतवर्षी बायोगॅस उभारणीत राज्यात आघाडी घेतली आहे.

आज वाढती लोकसंख्या आणि घटती शेतजमीन यामुळे पर्यावरणाचा प्रश्न जटील बनत चालला आहे. पर्यावरणाच्या असमतोलामुळे होणारी तापमानवाढ, बदलत चाललेलं ऋतुमान याचा मानवी जीवनावरही विपरित परिणाम होऊ लागला आहे. याचाच एक भाग म्हणून पर्यावरण रक्षणासाठी स्वयंपाकासाठी होणारी लाकूडतोड रोखून स्वयंपाकासाठी बायोगॅसचा वापर करणे काळाची गरज बनली आहे. हीच गरज ओळखून कोल्हापूर जिल्हा परिषदेनं जिल्हयात बायोगॅस उभारणीच्या कामास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.

ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात निर्माण होत असलेल्या इंधन टंचाईवर मात करण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय बायोगॅस योजना सुरु केली. ग्रामीण भागात आजही अनेक ठिकाणी इंधन म्हणून लाकडाचा वापर होतो. त्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड होते. त्याचा परिणाम पर्यावरणावर होऊ लागला आहे. स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅसशिवाय बायोगॅस प्रकल्पानंतर चांगल्या प्रकारचे सेंद्रिय खतही उपलब्ध होत आहे. वाढत्या खताच्या किमतींना आळा बसावा, एलपीजी गॅसवरील वाढता ताण कमी करणे हा देखील बायोगॅस योजना सुरु करण्यामागील हेतू आहे. बायोगॅसमधून वर्षाला उत्तम प्रकारचे चार ते पाच टन सेंद्रीय खत मिळते. या खतामुळे जमीनीची सुपिकता वाढण्यास मदत होते.

बायोगॅसचे जे काही अनेक लाभ आहेत, त्यामध्ये स्वयंपाकासाठी गॅसनिर्मिती, पारंपरिक ऊर्जासाधनांचा वापर कमी करणे, रासायनिक खतांचा वापर करुन सेंद्रीय खत वापरास प्रवृत्त करणे, ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान उंचावणे, स्वच्छता राखण्यास मदत करणे आणि वृक्षतोडीस आळा घालून निसर्गाचा समतोल राखणे हा बायोगॅसमागचा उद्देश असून त्यामुळे एका बायोगॅसमुळे दरवर्षी एका वृक्षाची तोड थांबते, वर्षाला दहा ते बारा एलपीजी गॅस सिलिंडरची बचत, तीन ते चार टन सेंद्रिय खताची निर्मिती, बायोगॅसवर स्वयंपाक केल्यास वेळेची 50 टक्के बचत व बायोगॅसला शौचालय जोडल्यामुळे आरोग्याचा प्रश्न सुटण्यास मदत होते.

एकंदरीत पर्यावरण रक्षणासाठी आणि महिलांच्या आरोग्यसाठी बायोगॅस संयंत्राची उभारणी घरोघरी होणे काळाची गरज आहे. पर्यावरण रक्षणाचा मुख्य हेतू डोळयासमोर ठेवून कोल्हापूर जिल्हा परिषदेनं बायोगॅस सयंत्र उभारणीमध्ये राज्यात आज तरी आघाडी घेतली असून यापुढेही कोल्हापूरची ही गौरवशाली परंपरा वध्दींगत करण्यावर जिल्हा परिषद प्रशासनाने भर दिला आहे.
-जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर.

No comments:

Post a Comment