Tuesday, 3 June 2014

येथे रात्रीही सुर्य उगवतो....

मंगळवार, ०३ जून, २०१४



ग्रामपंचायतींचे कार्यालये टेक्नोसॅव्ही करतांना ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी विशेष लक्ष घालून केलेलं महत्वाचं काम म्हणजे गावांचा पर्यावरणस्नेही शाश्वत विकास. पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना राबविण्याचा जयंत पाटलांनी निर्णय घेतला आणि योजनेचे स्वरूपही तशाच पद्धतीने निश्चित करण्यात आले. यात गाव स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार असण्याबरोबर अपारंपरिक उर्जा साधनांचा वापर वाढवण्याला गती देण्यात आली... 

याचा एक चांगला परिणाम गावागावांमध्ये दिसून येऊ लागला... काही गावांनी तर अतिशय नेत्रदिपक कामगिरी केली... याच एक उत्तम उदाहरण राज्यात आकाराला आलं आणि सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्याच्या माण्याची वाडी ग्रामपंचायतीनं संपूर्ण गाव सौरग्राम मध्ये रुपांतरीत केलं... संपुर्ण गावाला दर महिन्याला ३० हजार रुपयांचे वीज बिल यायचे. सौरग्राम झाल्यानंतर या गावाच्या वीजदरात ७० टक्क्यांनी कमी आली आणि हे वीजबिल ३० हजार रुपयांहून ९ हजार रुपयांपर्यंत खाली आलं.

गावासाठी पर्यावरण रक्षण हा फक्त एक शब्द राहिला नाही.... तो जीवन जगण्याचा मार्ग आणि उत्पन्नाचे एक साधन झाले. या कामाची सुरुवात गावात सौरपथदिवे बसवण्यापासून झाली... सौरपथ दिवे बसवण्यासाठी ग्रामपंचायतीत बोलावण्यात आलेल्या बैठकीतच गावातील सर्व घरांवर सौर पॅनल बसवण्याचा निर्णय झाला.. गावकऱ्यांनी एकमुखाने या निर्णयाला पाठिंबा दिला आणि ग्रामपंचायतीने अशी उपकरणे विकणाऱ्या विक्रेत्यांसोबत चर्चा केली... दरासाठी वाटाघाटी केल्या... त्यांच्या या चर्चेलाही यश मिळालं आणि एका सौर पॅनलची किंमत ९००० रुपयांहून ५७०० रुपये इतकी कमी झाली.

शासकीय योजनेतून ग्रामपंचायतीला सौर पथदिव्यांचा खर्च अनुदान स्वरूपात मिळाला असला तरी प्रत्येक घरावरील सौर पॅनलचा खर्च त्या त्या कुटुंबाने स्वखुशीने केला आणि १५ जानेवारी २०११ रोजी या संपूर्ण गावात रात्री पहिल्यांदा सुर्य उगवला... . तो आजतागायत उगवत आहे. सौर उर्जेच्या रुपानं.

४४८ लोकसंख्येचं आणि १११ उंबऱ्यांचं हे गाव...माण्याची वाडी... इको व्हिलेज योजनेअंतर्गत गावानं गावातील लोकसंख्येच्या तुलनेत २२०८ झाडं लावली... त्यात १२५० झाडं जगवण्यात ग्रामपंचायतीला यश आलं... ही झाडं जगवण्यासाठी देखील सांडपाणी आणि कचऱ्यापासून तयार केलेल्या सेंद्रीय खताचाच उपयोग करण्यात आला

गावातील १६ कुटुंबाकडे त्यांचे स्वत:चे बायोगॅस आहेत. ग्रामसभेची नोटीस आता पारंपरिक पद्धतीबरोबर गावकऱ्यांच्या हातातील मोबाईलवरही जात आहे. सर्वप्रकारचे दाखले संगणकीकृत स्वरूपात देतांना ग्रामपंचायतीने वॉर्डसभा, महिला सभा आणि ग्रामसभेचे उत्कृष्ट आयोजन करीत नुकताच राष्ट्रीयस्तरावरचा १० लाख रुपयांचा गौरव ग्रामसभा पुरस्कारही पटकवला आहे.

गावात ब वर्ग श्रेणीची सात वर्गखोल्यांची जिल्हा परिषदेची शाळा आहे. शाळेला जोडून मोठं मैदान आणि मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आहे. अद्यावत संगणक कक्ष, उत्तम प्रयोगशाळा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण ही वैशिष्टये असलेल्या या शाळेच्या प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आला आहे.

शाळेबरोबर गावात सांडपाणी आणि घनकचऱ्याची उत्तम व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित आहे. रेनवॉटर हार्वेस्टिंग ही गावासाठी केवळ तांत्रिक संकल्पना नाही तर गावानं प्रत्यक्षात टाकलेलं पाऊल आहे. पडणाऱ्या पावसाचं पाणी विहिरीत साठवून ग्रामपंचायतीने ते बोअरवेलद्वारे ते सिंचन, कपडे आणि जनावरं धुण्यासाठी उपलब्ध करून दिलं आहे.

मागील १० वर्षांपासून गाव निर्मलग्राम आहे. सांडपाण्याचे संकलन आणि पुनर्वापर, कचऱ्यापासून सेंद्रीय खत निर्मिती, त्याच्या विक्रीतून अल्पस्वरूपात का होईना ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात झालेली वाढ, मागील पाच वर्षापासून ग्रामपंचायतीची सर्व प्रकारची १०० टक्के करवसुली, ही ग्रामपंचायतीनं लोकांच्या सहकार्यातून टाकलेली काही महत्वाकांक्षी आणि यशस्वी पाऊलं आहेत.. 

ग्रामपंचायतीला आय.एस.ओ ९००१:२००८ नामांकन प्राप्त आहे. ग्रामपंचायतीने आतापर्यंत ७५ लाख रुपयांचे विविध राज्य तसेच राष्ट्रीय पुरस्कार मिळवले असून संपूर्ण गावानं मरणोत्तर नेत्रदानाचा तर तिघांनी देहदानाचा संकल्प केला आहे. सामाजिक दायित्व, वैचारिक एक्यवाक्यता आणि सामुहिक प्रयत्न यातून गावानं विकास कामात घेतलेली आघाडी पाहता हे गाव फक्त माण्याची वाडी नाही तर विकासाची सुपरफास्ट गाडी झालं आहे....

डॉ. सुरेखा मुळे

No comments:

Post a Comment