Thursday, 26 June 2014

महसूल यंत्रणेच्या चाकांना राजस्व अभियानाचे बळ !

गुरुवार, २६ जून, २०१४



महसूल विभाग.. प्रशासकीय यंत्रणेतील अत्यंत महत्वाचा घटक. शेतकरी, विद्यार्थी, व्यावसायिक, नोकरदार, कामगार, मजूर एवढेच नव्हे, तर समाजातील प्रत्येकाला महसूल विभागाशी आयुष्यात बऱ्याचदा काम पडते. शिक्षण असो, व्यवसाय असो किंवा नोकरी असो कुठलेही प्रोफेशन असताना महसूल कार्यालयांचा उंबरठा ओलांडावा लागतो. प्रशासकीय यंत्रणेचा डौलदार व भक्कम आधारस्तंभ असलेल्या महसूल विभागाला व्यवस्थापनामध्ये सर्वोच्चता आणि जनतेला सुविधा देण्यासाठी शासनाने सुवर्ण जयंती राजस्व अभियान आणले. या अभियानामुळे कर्तव्यांचे भले मोठे ओझे असलेल्या महसूल विभागाच्या चाकांना बळ प्राप्त झाले.

अमरावती विभागात या अभियानामुळे जनतेला महसूल विभाग आपल्या दारी असल्याचा अनुभव आला. मुलगा अथवा मुलगी शाळेत जायला लागल्यास पालकांना महसूल कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागतात. विविध दाखल्यांसाठी त्यांना त्रासून जावे लागते. मात्र, सुवर्ण जयंती राजस्व अभियानामुळे गावागावांत शिबिरे आयोजित करून अमरावती विभागात गत आर्थिक वर्षात फेब्रुवारीपर्यंत तब्बल 3 लाख 31 हजार 940 दाखल्यांचे वितरण करण्यात आले. त्यासाठी 1766 शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण सोडून दाखल्यांसाठी पायपीट करायची गरज भासली नाही.

शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असलेले शेतरस्ते अतिक्रमणातून मुक्त करण्याचे कार्यही अभियानाद्वारे करण्यात आले. विभागात 2 हजार 528.2 किलोमीटरचे शेतरस्ते अतिक्रमणातून मुक्त करण्यात आले. शेतरस्त्यांच्या बळकटीकरणामुळे शेतकऱ्यांना शेतमाल घरी किंवा बाजार समितीमध्ये घेऊन जाणे सहज शक्य झाले. ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनांची माहिती गावातच मिळावी म्हणून विभागात 7 हजार 164 गावांमध्ये चावडी वाचनाचा कार्यक्रम घेण्यात आला. शेतकऱ्यांची फेरफारीची प्रकरणे मिटविण्यासाठी शिबिरातच फेरफार अदालतींचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण विभागात 76 हजार 601 फेरफार अदालतींचे आयोजन करण्यात आले.

महसूल अधिकाऱ्यांकडे अर्धन्यायिक प्रकरणांचा त्वरेने निपटारा करण्यासाठी महसूल अदालतींचे आयोजन करण्यात आले. या अदालतींमुळे नागरिकांना जलद न्याय मिळाला व त्यांची प्रलंबित कामे मार्गी लागली. विभागात 27 महसूल अदालतींद्वारे 463 प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच भूसंपादन केलेल्या प्रकरणांमध्ये गाव दप्तरी सर्व उतारे योग्य प्रकारे सुधारीत करण्यात आले.

विभागातील संपूर्ण 56 तालुक्यांत महसूल विभागाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम विस्तारीत समाधान योजना राबविण्यात येत आहे. विस्तारीत समाधान योजनेमध्ये शिबिरे घेण्यात येऊन अन्य विभागांचे प्रलंबित प्रशासकीय कामकाजही केले जाते. परिणामी, जनतेची सर्व कामे शिबिरांमध्ये होत असल्यामुळे त्यांची पायपीट वाचली.

सुवर्ण जयंती राजस्व अभियानामुळे महसूल यंत्रणेला गती मिळाली. प्रशासकीय कामकाजाचा वेग वाढला. नागरिकांची महसूलविषयक कामे शिबिरांमध्ये होत असल्यामुळे त्यांचा वेळ व पैसाही वाचला. निश्चितच या अभियानामुळे महसूल यंत्रणेला भरारी प्राप्त झाली.
-नीलेश तायडे, प्र.सहाय्यक संचालक,
विभागीय माहिती कार्यालय, अमरावती

No comments:

Post a Comment