Tuesday, 17 June 2014

चांगल्या कामाने दिली कर्जमुक्ती

मंगळवार, १७ जून, २०१४



एखादी शासकीय योजना उत्तमरितीने राबवली तर गावाचा कसा कायापालट होऊ शकतो हे पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेने दाखवून दिले आहे. या योजनेने महाराष्ट्रातील गावं हिरवीगार तर केलीच परंतू गावांचा पर्यावरणस्नेही शाश्वत विकास साधतांना ग्रामपंचायतींना आर्थिक सक्षमताही मिळवून दिली.

भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील बिड सितेपार ग्रामपंचायत ही याला अपवाद नाही. ११३१ लोकसंख्येच्या या गावात ग्रामपंचायतीने स्वच्छता अभियान, निर्मलग्राम अभियान यशस्वीपणे राबवलं. २००६-०७ मध्ये गाव “निर्मल” घोषित झालं आणि गावाला पुरस्कार मिळाला. गावानं यात सातत्य राखलं आणि २००९-१० मध्ये गाव संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात राज्यस्तरावर प्रथम आलं. गावानं गौरव ग्रामसभा स्पर्धेत आधी जिल्हास्तरावर आणि मग विभागस्तरावर बक्षीस मिळवलं.

राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत मजुरांना १०० दिवसांचा शाश्वत रोजगार देऊन गावानं या योजनेतून गाव विकासाची अनेक काम उत्कृष्टपद्धतीने केली. याची दखल केंद्र शासनाने घेतली आणि गावाचा यासाठी २००८-०९ आणि २००९-१० या दोन वर्षात पुरस्कार देऊन सन्मान केला. यातून ग्रामपंचायतीने पाणंद रस्ते, तलाव खोलीकरण, बंधाऱ्यांची कामे केली. प्रकल्पातील गाळ काढून पाणीसंचय वाढवला, गावात मोठ्याप्रमाणात वृक्ष लागवड केली.

गावात आज दारु आणि जुगारबंदी आहे. २००९-१० ते २०११-१२ या तीन वर्षात ग्रामपंचायतीने घर आणि पाणीपट्टीची १०० टक्के वसुली केली. गावाचा सर्वांगीण विकास करायचा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल केली तर अडचणी आपोआप दूर होतात याचा प्रत्यय ग्रामपंचायतीला आला.

पाच वर्षांपूर्वी जी ग्रामपंचायत ५४ हजार रुपयांच्या कर्जात होती ती आज पुर्णपणे कर्जमुक्त झाली आहे एवढेच नाही तर लाखो रुपयांच्या बक्षीसाने गौरविली गेली आहे. ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढावे यासाठी ग्रामपंचायतीने गाळे बांधून ते बेरोजगारांना भाडे तत्वावर उपलब्ध करून दिले आहेत. आर्थिक सक्षमतेचे हेच सुत्र डोळ्यासमोर ठेऊन ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीच्या जागेवर पेरु, आंबा, लिंबू या सारख्या वृक्षांची लागवड केली आहे.

गावात २ सौर पथ दिवे असून एक अभ्यासिका आहे. प्रत्येक योजनेची सविस्तर माहिती गावातील फलकावर प्रसिद्ध केल्याने ती योजना गावातील लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत तर झालीच पण त्यात लोकसहभागही वाढला. मागासवर्गीय मुलांसाठी असलेल्या निधीतून विद्यार्थ्यांना गणवेश वाटप असो किंवा महिला बाल कल्याण निधीतून अंगणवाडीत बांधलेले स्वच्छतागृह. ग्रामपंचायतीने गावातील पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य दिल्याचे लक्षात येते. ग्रामपंचायतीने २००९-१० मध्ये यशवंत पंचायतराज अभियानात विभागस्तरीय दुसरा आणि २०१०-११ मध्ये राज्यस्तरीय दुसरा पुरस्कार प्राप्त केला आहे. पंचायतराज सबलीकरण आणि उत्तरदायित्व प्रोत्साहन योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीला केंद्रीय पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे.

गावची लोकसंख्या अवघी ११३१ पण गावानं पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेत झाडं लावली ७०१०. लोकसहभागातून लावलेल्या या झाडांना गावानं पोटच्या पोराप्रमाणं सांभाळलं आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांना ट्री गार्ड लावायलाही ते विसरले नाहीत. महात्मा ज्योतिबा फुले जलभुमी अभियानांतर्गत गावाने ४ वनराई बंधारे बांधले. सांडपाण्याचा पुनर्वापर करीत परसबाग फुलवली. पावसाचे रस्त्यावरून वाहून जाणारे पाणी एका गाव तलावात संकलित केले. पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेत तीन वर्षात पूर्ण करावयाचे निकष पहिल्याच वर्षी पुर्ण केल्याने गावाला “पर्यावरण विकासरत्न” पुरस्कार देखील मिळाला आहे.

शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा तर त्या योजना माहित तर असायला हव्यात, या उद्देशानं गावातील १०० टक्के कुटुंबाने लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार होत गावाला “लोकराज्य” ग्राम असण्याचा बहुमानही मिळवून दिला आहे.

पाणी पुरवठा योजनांची देखभाल दुरुस्ती आणि सांडपाण्याचा पुनर्वापर याकरिता गावाला जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाला आहे तर गुण्यागोविंदानं नांदणारं आणि गावात कुठलाही तंटा नसलेलं गाव म्हणून शाहु फुले आंबेडकर दलित वस्ती सुधारणा पुरस्कार आणि तंटामुक्त गाव पुरस्कार ही गावाला मिळाला आहे. गावाच्या विकासाची दोरी निरजना खंडाळकर या महिला ग्रामसेवकाच्या हाती असून त्यांच्या उत्तम प्रशासनातून ग्रामपंचायतीने विकास कामात कात टाकली आहे.
...
डॉ. सुरेखा मुळे

No comments:

Post a Comment