Wednesday, 11 June 2014

चिरंतन पाण्यासाठी 'वर्धा पॅटर्न'

बुधवार, ११ जून, २०१४



उन्हाळ्यात पाण्याचे साठे आटतात. पाण्यासाठी त्राही त्राही होऊ नये, पाण्याचे साठे आटू नयेत, जनतेची होणारी गैरसोय आणि हाल होऊ नयेत, यासाठी वर्धा पॅटर्न समोर आला. पेयजल साठे बळकट अन् चिरंतन करण्याकरीता शासनाने भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेवर जबाबदारी सोपवली. राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत वर्धा जिल्ह्यात हा संशोधनात्मक उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात येतो आहे. या संशोधनात्मक उपक्रमालाच 'वर्धा पॅटर्न' म्हणतात.

वर्धा पॅटर्नअंतर्गत उथळ, खोल जलधारक प्रस्तरांचे पुनर्भरण करण्यात येते. नाविन्यपूर्ण भूमिगत सिमेंट बंधारे, रिवर्स ग्रेडिएंटमध्ये नाला खोलीकरण आणि रिचार्ज शाफ्टच्या उपाययोजनांचा या पॅटर्नमध्ये समावेश आहे. या सर्वांचे एकत्रीकरण करून पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण करण्यासाठी जो प्रकल्प तयार करण्यात आला, त्यालाच पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या प्रधान सचिव, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या संचालकांनी वर्धा पॅटर्न नाव दिले.

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकटीकरणासाठी 24 गावांत 82 उपाययोजनांचा कार्यक्रम प्रस्तावित करण्यात आला होता. त्यात प्रामुख्याने 4 सिमेंट बंधारे, 15 भूमिगत सिमेंट बंधारे, 16 नाला ट्रेंचमध्ये (नाला खोलीकरण रिव्हर्स ग्रेडिएंट) 47 रिचार्ज शाफ्ट प्रस्तावित होते. सदर कार्यक्रमात टंचाईग्रस्त आणि टँकरग्रस्त गावांना प्राधान्य देण्यात आले.
 
नाला खोलीकरण

रिवर्स ग्रेडिएंटने नाला खोलीकरण करावे लागते. स्त्रोताच्या वरील भागात नाला बऱ्याच वेळा गाळाने बुजलेला असतो. निमुळता असतो, वळणे नागमोडी असतात. त्यामुळे नाल्यात पाणी साठत नाही व वेगाने वाहून जाते. या नाला पात्रात पाणी साठून राहणे, साठलेल्या पाण्याचे योग्यप्रकारे पुनर्भरण व्हावे म्हणून रिव्हर्स ग्रेडिएंटद्वारे नाला खोलीकरण कार्यपद्धती विकसीत करण्यात आली. रिव्हर्स ग्रेडिएंट नाला खोलीकरणामध्ये नाला खोलीकरण (नाला ट्रेंच) तीन भागात विभागलेले आहे. एक ते दोन मीटर खोलीपर्यंत भूस्तरीय रचनेच्या आधारावर, विहिरीच्या वरच्या भागामध्ये 1 मीटर खोली 100 मीटरपर्यंत, दीड मीटर खोली पुढील 100 मीटरपर्यंत व दोन मीटर खोली शेवटच्या 100 मीटरपर्यंत, अतिरिक्त जलसाठा निर्माण करण्याकरीता नाला खोलीकरण करता येते. जिल्ह्यातील 30 गावांमध्ये नाला ट्रेंच करण्यात आलेले आहे. नाला ट्रेंचमुळे नाला पात्र कोरडे झाल्यानंतरही डोह तयार झाल्याने दीर्घ पाणीसाठा राहण्यास मदत होते. सन 2012-13 अंतर्गत 15 गावांमध्ये अशी नालाखोलीकरणाची कामे करण्यात आली आहेत.
 
भूमिगत सिमेंट बंधारा

साधारणतः नाला पात्रातले पाणी डिसेंबर ते जानेवारी महिन्यात आटते. त्यामुळे भूजलाचे पुनर्भरण होत नाही. तसेच झालेले पुनर्भरण नाल्याच्या खालील जलधारक प्रस्तरामधून वाहून जाते. हे पाणी अडविण्यासाठी भूमिगत सिमेंट बंधारा हे तंत्र विकसित करण्यात आले. त्याद्वारे भूजल अडवून स्त्रोतातील पाणी साठ्यात वाढ करण्यात येते. त्यामुळे उन्हाळ्यातही पाण्याचे स्त्रोत आटत नाहीत. काळी माती आणि चिकन माती उपलब्ध होत नसल्यामुळे हे तंत्र विकसित करण्यात आलेले आहे. यामध्ये नाला पात्रात कठीण दगडापर्यंत खोदून आरसीसी स्ट्रक्चर उभारण्यात येते. ते जमिनीच्या दोन फुटावरपर्यंत नाला पात्रात ठेवण्यात येते. काळ्या मातीच्या भूमिगत सिमेंट बंधाऱ्यापेक्षा हे स्ट्रक्चर अत्यंत उपयोगी असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे गावांचा उन्हाळ्यातील पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

आरसीसी वॉल यालाच भूमिगत सिमेंट बंधारा असे ही म्हटले जाते. जमिनीखाली वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी, पाण्याच्या शाश्वेत विकासासाठी या बंधाऱ्याचा वापर करण्यात येतो. भूमिगत बंधाऱ्यांमुळे पुनर्भरण होऊन मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होण्यास मदत होते.
 
रिचार्ज शाफ्ट

उथळ आणि खोल जलधर प्रस्तराचे पुनर्भरण करण्यासाठी रिचार्ज शाफ्ट या प्रणालीचा वापर करण्यात येतो. पाच रिचार्ज शाफ्टद्वारे 2 हजार 115 घनमीटर पाण्याचे पुनर्भरण करण्यात आलेले आहे. त्यातून साठा अतिरिक्त तयार झालेल्या जलसाठ्याद्वारे उथळ व खोल जलधराचे पुनर्भरन करण्यासाठी रिचार्ज शाफ्टचा वापर करण्यात येतो.
 
गावांचा सुटला पाणी प्रश्न

वर्धा पॅटर्नमुळे जिल्ह्यातील दहेगाव मिस्कीन, मोई, आंबोंडा आणि हिरापूर ही गावे टँकरमुक्त झाली आहेत. शिवाय जिल्हाही पाण्याच्या सुनियोजनामुळे टँकरमुक्त झाला आहे. वर्धा पॅटर्नमुळे पाण्याची भेडसावणारी समस्या मिटण्यास मदत झाली आहे.

- जिल्हा माहिती कार्यालय, वर्धा.

No comments:

Post a Comment