Thursday, 5 June 2014

आदिवासी बहुल क्षेत्रातील ग्रामपंचायत सांधतेय विकासाची 'दरी'

गुरुवार, ०५ जून, २०१४



शहरात चांगल्या सुविधा मिळताहेत म्हणून शहराकडे धावणाऱ्या लोंढ्यावर अनेकजण बोलतात. पण गाव विकासातल्या उणिवा शोधून काढून या दऱ्या सांधण्याचं काम फार थोडेजण करतात. आणि जर हे काम दुर्गम आदिवासी भागातील ग्रामसेवक आणि सरपंच करीत असतील तर गाव विकासातले त्यांचे हे योगदान निश्चित कौतुकास्पद ठरते. 

तालुका-जिल्हा नाशिकच्या 'दरी' या ग्रामपंचायतीची ही गोष्ट. अनुसूचित क्षेत्रात मोडणाऱ्या या ग्रामपंचायतीची सन २०११ च्या जणगणनेप्रमाणे लोकसंख्या ही २०११ च. गावातील ७० टक्के लोकसंख्या आदिवासी. गावानं निर्मलग्राम, तंटामुक्त ग्राम, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, यशवंत पंचायतराज अभियान, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना अशा वेगवेगळ्या अभियानात आणि स्पर्धेत भाग घेतला. एक होऊन गाव विकासाच्या कामाला गती दिली आणि साधारणत: दोन ते तीन वर्षात १३ लाख रुपयांची बक्षिसे जिंकली तर विविध पुरस्काराने गावाची शान वाढवली.

पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेत गावाने सहभाग घेतला. गावची लोकसंख्या २०११ पण गावानं झाडं लावली ४० हजार. यातली २८,००० झाडं जगवण्यात गावाला यश आलं. आळंदी कॅनॉल गावातून जात असल्याने गावाला बारमाही पाणी. दुष्काळाची झळ या गावाला कधीच लागत नाही... असं असलं तरी गावाला पाण्याचे महत्व समजलेले.. म्हणूनच १०० टक्के घरांच्या पाण्याचे संकलन आणि त्याचा पुनर्वापर करीत फुलवलेली कर्दळीची फुलशेती त्यांच्यादृष्टीने महत्वाची. पाच गुंठे जमिनीवर ही कर्दळीची बाग फुलवलेली. त्यावर तीन कुटुंबाचा उदरनिर्वाह.

आदिवासी बहुल क्षेत्रातील असली तरी ग्रामपंचायतीची सर्वप्रकारची करवसुली मागील तीन वर्षांपासून १०० टक्के... गावात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक वापरावर बंदी असून सर्व उत्सवमूर्तींचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्याची सवय गावाने लावून घेतलेली. संगणक, प्रिंटरसह ग्रामपंचायतीचे कार्यालय सुसज्ज असून आजमितीस १२ ते १३ प्रकारचे दाखले ग्रामपंचायतीतच दिले जातात. तर ग्रामपंचायतीचे सर्व प्रकारचे लेखे ऑनलाईन करण्याचे काम सुरु आहे. यशवंत पंचायतराज अभियानात ग्रामपंचायत (पेसा अंतर्गत) राज्यस्तरावर प्रथम तर पंचायतराज उत्तदायित्व आणि प्रोत्साहन योजनेअंतर्गत राष्ट्रीय पातळीवर गौरविली गेलेली.

गावातील १०० टक्के पथदिवे हे सीएफएल बल्बचे. गावात १० टक्के कुटुंबाकडे बायोगॅस असून घनकचरा व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत सगळ्या गावचा कचरा एकत्र करून त्याचे कंपोस्ट खत तयार केले जाते. हे खत विकून ग्रामपंचायतीला वर्षाला ५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळते.

गावात ४५ कुटुबांना सौर कंदिलांचे वितरण करण्यात आले आहे. गाव १०० टक्के हागणदारीमुक्त असून गाव निर्मल ठेवण्याचा वसा गावानं आजतागायत जपला आहे. गावात जिल्हापरिषदेची प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आहे. 

गावात समाज मंदीर, व्यायाम शाळा, वाचनालय, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, स्मशानभूमी, पोस्ट ऑफीस, अंगणवाडी, वसतीगृह, सहकारी बँक, सहकारी सोसायटी, बचतगट वर्कशेड, प्राथमिक शाळा किचन शेड, सामाजिक सभागृह यासारख्या सार्वजनिक सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. आदिवासी असले तरी गाव कुपोषणमुक्त आहे. गावात हर्बल गार्डन आहे. 

हरियाली पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत उत्तम काम झालयाने गावातील पाण्याच्या भुजल पातळीत १०५ मीटरने वाढ झाली आहे. या योजनेतून चर खोदणे, शेततळे, नालाबांध सिमेंट बंधारे, वृक्ष लागवड, दगडी बांध यासारखी कामे पूर्ण झाली आहेत. ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गावात पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले.

ही योजना राबवावयाची म्हणून ग्रामपंचायतीने एक लाख रोपांची रोपवाटिका तयार केली. आपल्या गावात ही रोप लावलीच पण इतर ८ ग्रामपंचायतींनाही रोपाचे वितरण केले. गावातील शेतकऱ्याना ही रोपं दिली. पर्यावरणविकास रत्न पुरस्कार मिळवणाऱ्या या ग्रामपंचायतीने अस्पृश्यता निवारणात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले असून विकास पथावर अग्रेसर होतांना सरपंच सौ.गजराबाई आनंदराव लहानगे आणि ग्रामसेवक दौलत पंढरीनाथ गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक विषमतेची 'दरी' सांधण्यात देखील यश मिळवले आहे.

-डॉ.सुरेखा मधुकरराव मुळे

No comments:

Post a Comment