Saturday, 21 June 2014

खुद ही को कर बुलंद इतना…

शनिवार, २१ जून, २०१४

कोणत्याही देशाची प्रगती त्या देशातील राज्यात, जिल्हयात व तालुक्यात दारिद्रय निर्मूलन किती झाले आहे यावरून ओळखता येते. हे दारिद्रयाचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात येते.

सन 1980 - 81 मध्ये एकात्मिक ग्रामीण विकास योजना ट्रायसेन, बालिका समृध्दी योजना अशा वैयक्तिक लाभाच्या योजना केंद्र शासनाने ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील व्यक्तींसाठी राबविल्या. या योजनेतून पशुपालन चहा दुकान, बांगडी व्यवसाय अशा व्यवसायांना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत अनुदान व बॅकेमार्फत कर्जपुरवठा करून लाभार्थीला दारिद्रयरेषेच्या वर आणणेसाठी प्रयत्न झाले. परंतु या योजनेमध्ये परतफेडीचे प्रमाण अत्यल्प दिसून आले व अपेक्षित प्रमाणात दारिद्रय निर्मूलन झाले नाही. त्यामुळे सदर सर्व योजनांचे एकत्रीकरण करुन 1 एप्रिल 1999 पासून स्वर्ण जयंती ग्राम स्वंरोजगार योजना ही दारिद्रय निर्मूलनाची महत्त्वाकांक्षी योजना सुरु करण्यात आली.

स्वयंसहाय्यता गटांनी केवळ बचतीपुरतेच मर्यादित न रहाता त्यांनी व्यवसाय सुरु करून स्वत:ची आर्थिक परिस्थिती सुधारावी व त्यांना नियमित रोजगार मिळावा यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून दारिद्रय रेषेखालील स्वयंसहाय्यता गटांना काथ्या व्यवसाय, केरसुणी तयार करणे, बांबूकाम, लाकडी खेळणी तयार करणे, ज्वेलरी तयार करणे, गारमेंट ट्रेनिंग, शिवणकला, फळ प्रक्रिया, डाळ प्रक्रिया, दुग्ध व्यवसाय, हळद पावडर तयार करणे, राईस मिल तयार करणे, मका प्रक्रिया, बेकरी उत्पादने इ. वेगवेगळया व्यवसायांचे प्रशिक्षण बचतगटांना देण्यात आले.

दारिद्रय रेषेखालील गटांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्री करता तालुका स्तरावर व्यापारी गाळे बांधून दारिद्रय रेषेखालील स्वयंसहाय्यता गटांनी आपल्या मालाच्या विक्रीसाठी वितरित केले आहेत.

बाजारपेठेतील बदलत्या मागणीचा विचार करून बचतगटांना आपल्या उत्पादनात फेरबदल करून त्याचा दर्जा सुधारण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन वेळोवेळी केले जाते. त्याचप्रमाणे राष्ट्रीय, विभागीय, जिल्हास्तरावरील प्रदर्शनामध्ये सहभाग घेण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून स्टॉल उपलब्ध करुन देवून उत्पादन विक्रीची नवी कवाडे उघडून देण्याचा प्रयत्न केला जातो.

दारिद्रय रेषेखालील गटांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री करण्यासाठी त्यांना योग्य भाव मिळण्यासाठी त्यांच्यामध्ये योग्य पॅकेजिंग, मार्केटिंग कौशल्ये विकसित व्हावीत, गटांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी जिल्हास्तरावर पाच दिवसाचे दख्खन जत्रा प्रर्दशन आयोजित करुन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने गटांना सुवर्णसंधी उपलब्ध करून दिलेली आहे.

दारिद्रय रेषेखालील अनेक स्वयंसहाय्यता गट यशस्वी झालेले आहेत. त्यांना नियमित रोजगार उपलब्ध झाल्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारली आहे. इतर स्वयंसहाय्यता बचत गटांना प्रेरणा ठरेल अशा उत्कृष्ट गटांची नोंद घेऊन अशा गटांना महाराष्ट्र शासनामार्फत तालुका जिल्हा विभाग स्तरावर राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार देवून गौरविले आहे. त्यामुळे स्वयंसहाय्यता बचतगटांमध्ये जिद्द निर्माण करुन गटांच्या महिला सामाजिक जडणघडणीमध्ये त्यांचा सहभागामुळे त्यांच्यामध्ये धाडस निर्माण झाले आहे.

त्याच धाडसाचे उदाहरण म्हणजे मिरज तालुक्यातील जिजाऊ स्वयंसहाय्यता बचत गट, सलगरे या बचतगटाची स्थापना दि. 28/02/2009 रोजी झाली. गटामध्ये एकूण 10 सभासद असून ते सर्व दारिद्रय रेषेखालील आहेत. बचत रक्कम रु. 100 /- प्रत्येक महिन्याच्या 7 ते 10 तारखे अखेर जमा करून मासिक सभा होते. गटाने खेळते भांडवल मिळाले मुख्य व्यवसाय करण्यात कर्ज अनुदान रू. 4 लाख मिळाले. त्यातून त्यांनी म्हशी खरेदी करून त्यांचा दुग्ध व्यवसाय सुरु केला. पहिल्या म्हशीसाठी घेतलेले कर्ज 100 % परतफेड केले. त्यामुळे त्यांना बॅंकेने दुसरी म्हैस दिली.

राष्ट्रीय विकास योजनेअंतर्गत जिल्हा पशुसवंर्धन खात्यामार्फत लघु अंडी उबविण्याचे यंत्र वाटप करण्यात आले आहे. या यंत्राची किंमत सुमारे 1.64 लाख पर्यंत आहेत. 25 % रक्कम स्वयंसहाय्यता गटामधून एकत्र करून भरली आहे. त्यामध्ये RIR व इतर जातीच्या कोंबडयांची अंडी उबवून त्याद्वारे निर्माण झालेली 1 दिवसाची कोंबडयांची पिल्ले शेतकऱ्यांना विकली जातात. त्याला प्रचंड मागणी आहे.

गटाच्या सचिव श्रीमती.वनिता विजय कुंडले यांनी गावामध्ये वेगवेगळया योजनांमध्ये उदा. जलस्वराज्य, निरंतर शिक्षण, तंटामुक्त अभियान, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, लेक वाचवा अभियान इको व्हिलेज इ. अंतर्गत महिलांचे मेळावे घेवून महिलांना सहभागी करून घेतले. महिला ग्रामसभेत महिलांची उपस्थिती घेवून महिलांच्या निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढविला. महिलांकरिता वेगवेगळी प्रशिक्षणे घेतले. रक्तदान शिबिर, आरोग्य जनजागृती करुन विविध स्पर्धांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण केले. गावांतील बचतगटांच्या महिलांमध्ये जागृती करून त्यांना घरोघरी शौचालय बांधण्यास प्रयत्न केले. शाळेचे गणवेष, शिलाई करणे, अंगणवाडीसाठी पूरक पोषण आहार करून दिला. इतर बचतगट स्थापन केले.

गटातील महिलांना दुग्ध व्यवसायाबरोबर हॉटेल व्यवसाय, फॅशन डिझायननिंग, शेळी पालन, कुक्कुट पालन इ. व्यवसायासाठी उत्तेजन दिले. गटाच्या मार्फत सामाजिक, उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती केली.

या सर्व उपक्रमाच्या माध्यमातून गावांतील महिलांचे नेतृत्व तिच्याकडे आले. महिलांच्या सर्व सुख-दु:खामध्ये ती सहभागी झाली. श्रीमती कुंडली यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही तिने या महिलांच्या सानिध्यात राहून आपल्या अडचणींना तोंड दिले. दरम्यानच्या काळात तिच्या पतीचे निधन झाले त्यामुळे घरात दुसरे कोणी नसल्यामुळे तिने माहेरी जाणे ठरविले होते. पण गावातील बचतगटातील सर्व महिलांनी तिला आधार देवून गावातच राहणेबाबत तिचे मन वळविले. आर्थिक परिस्थितीला सामोरे जात असताना महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत तिला सहयोगीनी या पदावर तिच्या सक्षमतेमुळे तिला नोकरी मिळाली. त्यामुळे तिच्या दोन मुलांचे संगोपन करण्यास हातभार लागला. गटामुळे तिला मानसिक आधार मिळाला. तिने गावामध्येच राहण्याचे ठरविले आहे.

या सर्व बाबींमुळे गटाची तालुका, जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांकासाठी व विभागीय स्तरावर द्वितीय क्रमांकासाठी निवड होवून त्यास राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार प्राप्त झाला.

या सर्व प्रगतीमुळे श्रीमती.वनिता विजय कुंडले यांची महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत समूह संघटन व्यक्ती (CRP) म्हणून निवड करण्यात आली.
-जिल्हा माहिती कार्यालय, सांगली

No comments:

Post a Comment