Monday, 2 June 2014

आत्माच्या सौजन्याने ठोसेघर येथे मधुबन ...!

सोमवार, ०२ जून, २०१४

आयुर्वेदात सांगितलेले मधाचे महत्व हे केवळ औषधी न राहता मानवाच्या जीवनमानात त्याची आर्थिक उन्नती करण्यासाठी आणि निसर्गचक्र वृध्दीसाठी फायदेशीर ठरत आहे. ठोसेघर येथे आत्माच्या माध्यमातून शंकर चव्हाण या शेतकऱ्यांने मधुबनची निर्मिती केली असून त्यापासून भविष्यात मधाचा ठोसेघर ब्रँड विकसीत करण्याचा मनोदय त्यांनी बोलून दाखविला.

आत्मा साताराचे प्रकल्प संचालक गणेश घोरपडे आणि जिल्हा प्रकल्प प्रवर्तक सुनील साबळे यांनी मधमाशा पालन व्यवसायाबाबत बारामती येथे जिल्ह्यातील 45 शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले. राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आणि आत्माच्या संयुक्तपणे हा प्रकल्प राबविला जातो. या प्रशिक्षणनंतर प्रत्यक्षात जो शेतकरी मधमाशापालन प्रकल्प करणार आहेत, अशा शेतकऱ्यांला मधमाशापालनासाठी 5 हजार रुपायाला एक याप्रमाणे पेटी दिली जाते. याला वसाहत म्हणतात. या 5 हजारांपैकी 1500 रुपयाचे शेतकऱ्याला शासनाकडून अनुदान मिळते.

सातारा जिल्ह्यातील सध्या ठोसेघर, वसंतगड आणि कीडगाव येथे मधमाशापालनाचा प्रकल्प शेतकरी राबवत आहेत. ठोसेघर येथील शेतकरी शंकर चव्हाण यांनी सध्या येथे 20 पेट्यांच्या माध्यमातून हा प्रकल्प सुरु केला आहे. मेलीफेरा जातीच्या मधमाशा या वसाहतीमध्ये आहेत. एका पेटीपासून वर्षभरामध्ये 50 किलो मध हा अपेक्षित आहे. चांगल्या उत्तम प्रकारच्या मधाची विक्री ही 200 ते 250 रुपयांना होते. म्हणजेच एका पेटीपासून वर्षाला 12,500 रुपयाचे उत्पन्न मिळू शकते.

या प्रकल्पाविषीयी माहिती देताना आत्माचे प्रकल्प संचालक गणेश घोरपडे म्हणाले, मेलीफेरा जातीच्या मधमाशांवर जिल्ह्यात प्रथमच हा प्रकल्प ठोसेघर येथे राबविण्यात येत आहे. मेलीफेरा जातीच्या मधमाशांचा फायदा म्हणजे वसाहत मोठी, माशा सोडून जात नाहीत. मधाचे उत्पादन जास्त प्रमाणात होते. शिवाय रोगप्रतिकार शक्ती जास्त असल्याने कोणत्याही रोगाला या लवकर बळी पडत नाहीत. जिल्ह्यात 500 मधपेटयांचे उद्दिष्ट असून पाटणमध्ये भविष्यात मोठा प्रकल्प राबविण्यात येणार असून सप्टेंबरपर्यंत 200 पेट्या ठेवण्यात येणार आहेत.

एका पेटीत एक राणी माशी असते ती दिवसाला 1000 ते 1200 अंडी देते. वसाहतीमध्ये असणाऱ्या कामकरी माशा या एक ते दीड किमी परिसरातून मकरंद गोळा करुन आणतात. परिसरात फुलोरा अधिक असल्यास 15दिवसात मध भरतो. कामकरी माशांपासून स्त्रवणारा राजान्न (रॉयल जेली) हे राणी माशीचे खाद्य असते. 

मधमाशा पालनापासून परागीभवन मोठ्या प्रमाणात होत असते. यामुळे शेती उत्पादनामध्ये 30 ते 40 टक्के वाढ होत असल्याने कॅलिफोर्निर्यांतील शेतकरी मधपाळांना आपल्या शेतामध्ये पेट्या ठेवण्यासाठी काही विशिष्ट रक्कम देतात, असे सांगून श्री. घोरपडे म्हणाले, भारतामध्ये प्रकल्पाकडे शेतकऱ्यांनी व्यावसायिक स्वरुपातून वळावे कारण मधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. परागीभवनामुळे शेती उत्पादनात वाढ याशिवाय मेण आणि राजन्नाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात मिळू शकते. या प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आत्मा सातारा कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहनही श्री. घोरपडे यांनी केले आहे.

- प्रशांत सातपुते, जिल्हा माहिती अधिकारी, सातारा

No comments:

Post a Comment