Wednesday, 18 June 2014

सेंद्रीय शेती, फायद्याची किती!

बुधवार, १८ जून, २०१४



रासायनिक खताच्या तुलनेत सेंद्रीय खते शेतजमिनीची गुणवत्ता कायम राखण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याने शेतकरी पुन्हा एकदा सेंद्रीय शेतीकडे वळत आहेत. अर्थात पुर्णत: पारंपरिक पद्धतीची शेती न करता त्याला शास्त्राची जोड देऊन अशी शेती होत असल्याने ती फायद्याची ठरते आहे. रत्नागिरीतील महमूद कादीर बरमारी यांच्या फळबागेला भेट दिल्यावर याचाच प्रत्यय येतो.

गुहागर तालुक्यातील पन्हाळे-चिखली गावात मांडवकरवाडी येथे राहत्या घराला लागून बरमारी यांची फळबाग आहे. आंबा आणि काजूसोबतच चिकू आणि पेरुची झाडेही बागेत आहेत. एकूण सहा एकर क्षेत्रात या कलमांची लागवड करण्यात आली असून याच परिसरात नर्सरीचा व्यवसायही सुरू करण्यात आला आहे. शेतीत सातत्याने प्रयोग करणे हा बरमारी यांचा छंद आहे. त्यांनी आंबा कलमाभोवती खत देण्यासाठी वर्तुळाकार रचना करून कडेला अननसाचे मिश्र पिक घेतले आहे. त्यामुळे आंबा आणि अननस एकमेकांना पुरक ठरत असून अननसासाठी वेगळा खर्च करावा लागत नाही.

शेतातच एकत्रित होणाऱ्या नारळाच्या झावळ्या आणि इतर कचऱ्याचा उपयोग ते सेंद्रीय खत बनविण्यासाठी करतात. खत तयार करण्यासाठी आवश्यक असणारे शेण मिळावे म्हणून त्यांनी देशी 8 जनावरे पाळली आहेत. जनावरांचा गोठाही कल्पकतेने तयार केला आहे. सोबतच गांडूळ खताचे युनिटही उभारले आहे. अतिरिक्त शेणाचा वापर करण्यासाठी गोबर गॅस संयत्र शेताच्या खालच्या बाजूस बसविले आहे. त्यामुळे कचरा, पाणी, शेण सहजपणे टाकीपर्यंत वाहून जाते आणि घराभोवती वासही येत नाही,असे बरमारी यांनी सांगितले.

शेतातील नर्सरीत आतापर्यंत 10 हजारांहून अधिक रोपे तयार करून कृषि विभाग आणि खाजकी ग्राहकांना देण्यात आली आहेत. फळांची गुणवत्ता उत्तम राहावी यासाठी खताचे योग्य नियोजन करण्यावरही त्याचा भर असतो. गांडुळ खताच्या 5 युनिटच्या माध्यमातून त्यांनी गेली दहा वर्षे शेतासाठी सेंद्रीय खत वापरले आहे. त्यामुळे बागेपासून मिळणारे उत्पन्न सतत वाढत आहे. शेतात पाण्यासाठी विहीरींवर पंप बसविण्यात आले आहे. आंब्याच्या कलमांच्या मधेच जामफळ आणि आवळ्याची काही झाडे लावण्यात आली आहेत. 

कल्पकता आणि शास्त्रीय माहितीचा सुंदर समन्वय साधत बरमारी यांनी शेती व्यवसाय विकसीत केला आहे. कृषि विभागाच्या अनेक योजनांचा त्यांनी योग्य पद्धतीने लाभ घेतला आहे. ग्रामीण भागातील या 'शेतीनिष्ठ' शेतकऱ्याची धडपड इतरांनाही मार्गदर्शक अशीच आहे.

-जिल्हा माहिती कार्यालय, रत्नागिरी

No comments:

Post a Comment