Tuesday, 15 July 2014

जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेत वाढ

मंगळवार, १५ जुलै, २०१४



राज्यातील जिल्हा परिषदांच्या सर्व शाळांचे विविध निकषांच्या आधारे मूल्यांकन करण्यात येत असून दोन वर्षात झालेल्या मूल्यांकनात शाळांची गुणवत्ता सुधारत असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात अ आणि ब वर्गातील शाळांची संख्या वाढतांना तर क, ड, इ वर्गातील शाळांची संख्या कमी होतांना दिसत आहे.

गावातील विद्यार्थ्यांना शहरी विद्यार्थ्यांप्रमाणे गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शैक्षणिक सुविधा मिळाव्यात या उद्देशाने ग्रामविकास विभागाने पुढाकार घेतला आणि एका कार्यगटाची स्थापना केली. या कार्यगटाने केलेल्या शिफारसींप्रमाणे राज्यातील जिल्हा परिषद शाळांचे २०० गुणांवर मुल्यांकन करण्याचा निश्चय करण्यात आला. यामध्ये भौतिक सुविधांना ३५ गुण, शालेय व्यवस्थापनाला ६५ गुण आणि अध्ययन अध्यापन संबंधित घटकाला १०० गुण देण्यात आले.

राज्यातील सर्व म्हणजे जवळपास ६१,८३३ जिल्हा परिषद शाळांचे मूल्यांकन २०१२-१३ साली करण्यात आले. हे मूल्यांकन करतांना शाळांना प्राप्त गुणांनुसार अ, ब, क, ड, इ अशा श्रेणी देण्यात आल्या. प्राप्त श्रेणीचा फलक शाळेबाहेर मोठ्या आकारात लावणे बंधनकारक करण्यात आले.

मूल्यांकनांच्या निकषांमध्ये शाळांमधील उपलब्ध भौतिक आणि शैक्षणिक सुविधा, शिक्षक-पालक बैठका, माता-पालक संघ, शिक्षकांचे प्रशिक्षण, शाळेची इमारत, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, शाळेच्या वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, शाळेला मैदान आहे किंवा नाही, विद्यार्थ्यांची उपस्थिती-अनुपस्थिती, ग्रामस्थांचा सहभाग अशा विविध निकषांचा समावेश आहे. या निकषांवर सर्व शाळांची तपासणी झाली.

शाळांचे २०१२-१३ साली पहिल्यांदा आणि २०१३-१४ साली दुसऱ्यांदा मूल्यांकन झाले. या दोन वर्षाच्या मूल्यांकनात अ, ब, क, ड, इ श्रेणीनिहाय शाळांची स्थिती खालीलप्रमाणे दिसून आली आहे.

पहिल्या वर्षीच्या मूल्यांकनात अ वर्गातील शाळांची संख्या ५४१ होती ती दुसऱ्या वर्षीच्या मूल्यांकनात १५९९ इतकी वाढली.

पहिल्या वर्षीच्या मूल्यांकनात ब वर्गातील शाळांची संख्या ६२४८ इतकी होती ती दुसऱ्या वर्षीच्या मूल्यांकनात १४९१८ इतकी वाढली.

पहिल्या वर्षीच्या मूल्यांकनात क वर्गातील शाळांची संख्या ४५,१०१ इतकी होती ती दुसऱ्या वर्षीच्या मूल्यांकनात ४०,७०८ इतकी कमी झाली.

पहिल्या वर्षीच्या मूल्यांकनात ड वर्गातील शाळांची संख्या ९६५२ इतकी होती. ती दुसऱ्या वर्षीच्या मूल्यांकनात ४९४६ इतकी कमी झाली.

पहिल्या वर्षीच्या मूल्यांकनात इ वर्गातील शाळांची संख्या २९१ इतकी होती. ती दुसऱ्या वर्षीच्या मूल्यांकनात ४६ इतकी कमी झाली.

म्हणजेच दुसऱ्या मूल्यांकनात शाळांची गुणवत्ता सुधारत असल्याचे स्पष्ट झाले असून राज्यात अ आणि ब वर्गातील शाळांची संख्या वाढतांना तर क, ड, इ वर्गातील शाळांची संख्या कमी होतांना दिसत आहे.
-डॉ.सुरेखा म. मुळे

No comments:

Post a Comment