Saturday, 5 July 2014

फलोत्पादनाचे 'जांभूळ आख्यान'

शनिवार, ०५ जुलै, २०१४


चित्रफीत पाहण्यासाठी खाली पहा...
जांभूळ हे फळ तसे फक्त जून आणि जुलै महिन्यात मिळते. रानावनात होणाऱ्या किंवा अंगण-परसातल्या झाडाला येणारी जांभळाची गर्द जांभळी फळे काहीशी गोड आंबट आणि थोडी तुरट चवीची, पण त्यांचा हा गोडवा जिभेवर रेंगाळत राहतो, तो अगदी वर्षभर.

मात्र या फळ पिकाचे व्यावसायिक उत्पन्न घेता येईल, इतक्या गांभिर्याने त्याकडे पाहिले गेले नाही. दापोली येथील बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाने जांभूळ पिकावर संशोधन करुन बहारडोली ही जात विकसित केली. या जातीची रसाळ जांभळे पिकताहेत ती कोकणापासून दूर खान्देशात. जळगाव जिल्ह्यातील अंतुर्ली, ता.पाचोरा येथील प्रगतीशील शेतकरी आणि माजी आमदार आर.ओ.पाटील यांनी जांभळाची शेती व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर असल्याचे सिद्ध केले आहे.

स्वतः प्रयोगशील शेतकरी असलेले श्री.पाटील यांनी आपली पूर्वीची आंब्याची बाग काढून तेथे जांभळाची बाग तयार केली. दरवर्षी टप्प्याने वाढवत आता सध्या त्यांनी 15 एकरवर जांभळाची लागवड केली आहे. 15 फूट बाय 15 फूट अंतरावर त्यांनी जांभळाची रोपे लावली. प्रती रोप 50 रुपये इतका खर्च आला. पुरेसे पाणी असावे म्हणून राष्ट्रीय फळबाग मिशन कार्यक्रमातून दोन एकराचे एक शेततळेही घेतले. ठिबक सिंचन अवलंबिले. एकदा रोप लावल्यानंतर चवथ्या वर्षापासून उत्पन्नास सुरुवात होते. सुरुवातीला प्रती झाड उत्पन्न कमी असले तरी झाडाचा डेरा वाढतो, तसे उत्पादनही वाढत जाते. कारण जांभळे ही तृतीय फांदीला (Tertiory Branch) लागतात. त्यामुळे झाडाचा शेंडा कापून त्याचा डेरा वाढविणे आवश्यक असते. त्यामुळे जसजसे झाडाचे वय वाढते तसे उत्पन्न वाढते. एका दहा वर्षे वयाच्या झाडापासून 25 ते 30 किलो पर्यंत उत्पन्न मिळते.

2012 मध्ये श्री.पाटील यांना पहिल्या टप्प्यात लागवड केलेल्या झाडांपासून बहार मिळाला. पक्व जांभळांचा दर्जा अतिशय चांगला राखल्याने व आकर्षक पॅकिंग, लेबलिंग करुन हे जांभूळ जेव्हा मुंबई-पुण्याच्या मॉलमध्ये पोहोचले तेव्हा ग्राहकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. 200 रुपये प्रतीकिलो दराने या जांभळाची विक्री होते.

एकूणच जांभळाची शेती फायदेशीर ठरली. सुरुवातीच्या काळात झाडांमध्ये आंतरपिकेही घेता येतात. झाडांच्या पोषणाची गरज पाहून शेणखत, विद्राव्य खते ठिबकद्वारे दिल्याने झाडे डोलदार झाली आणि पिक चांगले आले. आता जांभळाची उपलब्धता वर्षभर व्हावी, यासाठी श्री.पाटील यांचे प्रयत्न सुरु आहेत. कारण जांभळाचे आरोग्यदृष्ट्या महत्वही खूप आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी जांभूळ बी खूपच गुणकारी आहे. यादृष्टीने वर्षभर सरबत, स्क्वॅश, सिरप, जॅम, जेली यास्वरुपात कसे उपलब्ध करता येईल, यासाठी आता संशोधन सुरु आहे. त्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञही त्यांच्याकडे येऊन गेले. जांभूळ शेतीचा इतर शेतकऱ्यांनी अंगिकार करावा, म्हणूनही शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीचे उपक्रमही ते राबवित आहेत. कोकण कृषी विद्यापीठात सुरु झालेले हे फलोत्पादनाचे जांभुळ आख्यान खान्देशात रुजले.
-मिलिंद मधुकर दुसाने, जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव

No comments:

Post a Comment