Friday, 18 July 2014

रमाई घरकुल

शुक्रवार, १८ जुलै, २०१४



हलाखीच्या परिस्थितीत जगत असतांना साधी झोपडी बांधणं सुद्धा आमच्या आवाक्याबाहेर होत. सिमेंटची घरं पाहली की, आपल्या नशीबी अशा घरात राहणं कधी येईल हा विचार नेहमी मनात यायचा. शहरात राहत असतांना पक्क घर बांधण्यासाठी लागणारं भांडवल कुठून उभा करणार हा प्रश्न नेहमी असायचा. एक दिवस सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांनी रमाई घरकुल योजनेविषयी सांगितले आणि आमच्या पक्क्या घराच्या आशा पल्लवीत झाल्या. आता आपल्यालाही चांगल्या घरात रहायला मिळेल या भावनेने सगळे कुटूंब ओथंबून गेले होते. अखेर 2011-2012 मध्ये हे स्वप्न पूर्णत्वास आले अशा भावनिक शब्दात ज्योती रमेश चांदेकर यांनी रमाई घरकुला विषयी सांगितले.

चंद्रपूर महानगरपालिका अंतर्गत रमेश चांदेकर यांना सामाजिक न्याय विभागाच्या वतीने रमाई घरकुल बांधण्यासाठी दोन लाखांचे अनुदान देण्यात आले. या अनुदानातून त्यांच्या घराचे बांधकाम पूर्ण झाले असून चांदेकर कुटूंब या घरात वास्तव्यास आहे. त्यांची भेट घेण्यासाठी गेलो असता त्यांनी रमाई घरकुलाच्या रुपाने घराचे स्वप्न पूर्ण झाले असल्याचे सांगितले.

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने रमाई घरकुल योजनेत घरकुल मिळालं आणि आमला हक्काचा निवारा मिळाला. घरकुलामुळे कुटूंबाच्या निवाऱ्यासोबतच 10 वीत असलेल्या माझ्या मुलीच्या अभ्यासाची सोय झाली. पूर्वी आम्ही 8 बाय 10 च्या झोपडीत 5 व्यक्ती राहायचो, त्यामुळे मुलीला अभ्यासासाठी निवांतपणा मिळायचा नाही. याचा परिणाम अभ्यासावर व्हायचा. मात्र घरकुल मिळाल्यामुळे तिचे 10 वीचे वर्ष चांगले निघाले. रमाई घरकुल योजनेत 425 चौ.फुटाचे घर मिळाल्यामुळे मुलांना अभ्यासासाठी स्वतंत्र रुम उपलब्ध होवू शकली, या भावना आहेत रमाई घरकुल मिळालेल्या रमेश सोनबाजी चांदेकर यांच्या पत्नी ज्योती यांच्या. अपंग असलेल्या ज्योती यांचे पती मोची काम करत असून त्यांना समाज कल्याण विभागाच्या रमाई घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे. स्वत: कष्टकरी असलेल्या ज्योतीने इतरांनाही या योजनेविषयी सांगितले. 

शासनाच्या रमाई घरकुल योजनेअंतर्गत दोन लाखाचे अनुदान प्राप्त झाल्यानेच आम्ही घर बांधू शकलो व झोपडीतून पक्क्या घरात वास्तव्य करण्याचे भाग्य लाभले असेही त्यांनी सांगितले. समाजात सामाजिक प्रतिष्ठा या घरकुलामुळे मिळाली आणि आमच्या जीवनात मोठा बदल घडून आला, हे सर्व सामाजिक न्याय विभागाच्या सहाय्याने होऊ शकलं असे ज्योतीने अभिमानाने सांगितले.

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जातीच्या व्यक्तींना 425 चौ.फूट घर बांधण्यासाठी दोन लाखाचे अनुदान देण्याची शासनाची योजना आहे. तीन टप्प्यात देण्यात येणाऱ्या या अनुदानातून चंद्रपूर महापालिकेअंतर्गत गेल्या तीन वर्षात 667 लाभार्थ्यांना घरे मंजूर झाली असून यापैकी 325 घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तर ग्रामीण भागात ही योजना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून राबविण्यात येत असून गेल्या तीन वर्षात 11900 रमाई घरकुल बांधण्यात आली. सामान्य मानसाच्या जीवनात घरा इतके महत्व दुसऱ्या कुठल्या बाबीला नसतांना शासनाने उपलब्ध करुन दिलेला हक्काचा निवारा त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेत भर पाडणारा आहे.

-रवी गिते, जिल्हा माहिती अधिकारी, चंद्रपूर

No comments:

Post a Comment