Tuesday, 13 May 2014

अंगणवाडी घडवी संस्कारक्षम पिढी

मंगळवार, १३ मे, २०१४



गावाचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र शासनाचा एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन हा उपक्रम सन 2011 पासून राबविण्यात येत आहे. 'पाणी अडवा-पाणी जिरवा' हा या उपक्रमाचा उद्देश होय. शासनाच्या वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणेमार्फत गोंदिया जिल्ह्यातील 53 गावांची निवड करण्यात आली. जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील कृषी कार्यालयाअंतर्गत एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमाची सुरुवात झाली.

या उपक्रमाअंतर्गत गावाचा विकास साधण्याकरीता गावातील महिला, भूमिहीन, बालक, किशोरी, अल्पभूधारक, बलुतेदार, शेतकरी या सर्वांचा समावेश यात होतो. याकरीता गावातील प्रेरक प्रवेश उपक्रमाअंतर्गत अंगणवाडीची निवड करण्यात आली व गावातील अंगणवाडीला विविध प्रकारची बौद्धीक तसेच मनोरंजक, कृतिशील, मुलांना आवडणारी, शारिरीक विकासाच्या दृष्टीने विविध खेळणी देण्यात आली.

याआधी सुद्धा अंगणवाडीत चार्टस् उपलब्ध होते. परंतू मुलांच्या मनाचा कौल, वयोमर्यादा लक्षात घेऊन मुलांसाठी विविध सोयी उपलब्ध करुन देण्यात आल्या. ज्या मुलांचे पालक फक्त आहारापुरतेच अंगणवाडीत मुलांना पाठवायचे ती मुलेही त्या खेळण्यांमुळे अंगणवाडीमध्ये रमू लागली. मुले आनंदाने अंगणवाडीत वेळेवर हजर राहू लागली. अंगणवाडीत पटावर असलेली पण सतत गैरहजर राहणारी मुले आता पूर्णवेळ उपस्थित राहू लागली. त्यामुळे मुलांच्या पटसंख्येत वाढ झाली.

ज्या मुलांना अंगणवाडीत आणण्यास मदतनीस यांना वारंवार जावे लागत असे त्यांना बोलावून आणण्याचे प्रमाण कमी झाले. काही विद्यार्थ्यांचे पालक स्वत:हून मुलांना अंगणवाडीत आणून देऊ लागले. आमच्या मुलांना फळांची नावे, वारांची नावे, रंगाची नावे, 1 ते 100 पर्यंत उजळणी सर्व काही सांगता येतात. याशिवाय चढता, उतरता क्रम व इतर कृतिशील खेळही खेळता येतात, असे मुलांचे पालक अभिमानाने सांगू लागलेत.

काही विद्यार्थी आपल्या पालकांना वेळेवर अंगणवाडीत जाण्यास तयारी करुन मागू लागले व अंगणवाडी अगदी वेळेवर हजर राहू लागले. अंगणवाडीतील मुले अंगणवाडीत घोडा, सायकल, पाळणा ह्या वस्तू खेळायला मिळतात म्हणून अंगणवाडीत जायला आवडते असे सांगू लागले.

हा कायापालट एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमामुळे घडून आला. अंगणवाडीतील शिकणारे छोटे बालक संस्कारक्षम होऊ लागले. भविष्यातील घडणारी युवा पिढी व देशाचे भावी नागरिक ही वाटचाल आता अखंड अविरत चालू राहणारी होती यात शंका नाही.

या यशाकरीता गावकरी व इतर नागरिक एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना श्रेय देतात.
-श्रीमती पल्लवी धारवमाहिती सहायक, जिल्हा माहिती कार्यालय, गोंदिया

No comments:

Post a Comment