Saturday, 17 May 2014

पारंपरिक शेतीला हातभार लावणारी रेशीम शेती

शनिवार, १७ मे, २०१४



शेतकऱ्यांना त्यांच्या शेतव्यवसायाला आधार देणारी 'रेशीम शेती' ही अलिकडे प्रचंड लोकप्रिय झाली असून कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारा हा प्रमुख जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी आत्मसात केला आहे. जिल्ह्यात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर शेतकरी रेशीम शेतीकडे वळले असून यावर्षीही 200 एकर क्षेत्रावर तुतीची लागवड करण्यात येणार आहे.

नैसर्गिक रेशीम धाग्याची निर्मिती रेशीम अळीच्या कोषापासून होते. निसर्गात पाच प्रकारच्या रेशीम अळ्या आढळतात. यापासून निर्माण होणारा रेशीमधागा अतिशय लोकप्रिय असून त्याला मिळणारी किंमतही चांगली असल्याने शेतकऱ्यांनी त्याच्या उत्पादनाकडे वळावे, असा शासनाचा प्रयत्न आहे.

रेशीम शेतीसाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे म्हणून मोठ्या प्रमाणावर अनुदान दिले जाते. तुती लागवड व साहित्याच्या खरेदीसाठी युनिट कॉस्ट म्हणून 20 हजार रुपये अनुदान देण्यात येते. रेशीम कोष अंडीपुंज संगोपन गृहासाठी अनुदान योजना राबविण्यात येत असून 225 फुटाच्या संगोपन गृहाच्या बांधकामासाठी 21 हजार रुपये, 600 फुटाच्या संगोपन गृहासाठी 87 हजार 500 रुपये अनुदान देण्यात येते. रेशीम शेतीच्या एक एकर सिंचन व्यवस्थेसाठी 22 हजार 500 तर कीटक संगोपन साहित्यासाठी 52 हजार 500 रुपये अनुदान दिले जाते.

या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावावर किमान एक हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. बारमाही सिंचनाची व्यवस्था व पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी. अल्प, अत्यल्प व अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येते. या योजनेंतर्गत एक एकर क्षेत्रासाठी तुती लागवड व साहित्य पुरवठा तीन वर्षात दिल्या जातो. अनुदानाच्या लाभासाठी 75 टक्के तुतीची झाडे‍ जीवंत ठेवणे आवश्यक आहे. पहिल्या वर्षी 50 किलो, दुसऱ्या वर्षी 100 किलो व तिसऱ्या वर्षी 200 किलो रेशीम कोष उत्पादन काढावे लागते. तुती लागवड व साहित्य पुरवठा या योजनेध्ये पहिल्या वर्षी 6 हजार मजूरी खर्च व 8 हजार रुपयांचे साहित्य, तिसऱ्या वर्षी प्रती एकर 3 हजार या प्रमाणे मजूरी खर्च देण्यात येतो. पारंपरिक शेतीला हातभार लावणाऱ्या या शेतीला शेतकऱ्यांनी आत्मसात करणे आवश्यक आहे.
- जिल्हा माहिती कार्यालय, यवतमाळ

No comments:

Post a Comment