Tuesday, 27 May 2014

करार शेतीचा नवा ट्रेंड

मंगळवार, २७ मे, २०१४

जवळपास सर्वच क्षेत्रात आता कॉन्‍ट्रॅक्‍ट सिस्टिम आली आहे, त्‍यात शेतीचे क्षेत्र सुध्‍दा कसे मागे राहील. मालवण तालुक्‍यातील चुनवरे खांबटवाडी येथील शासनाचा कृषी भूषण पुरस्‍कार (सेंद्रीय शेती) प्राप्‍त शेतकरी उत्‍तम गावडे यांनी दुस-या शेतक-यांची जवळपास सात एकर जमिन करार पध्‍दतीने घेऊन त्‍यामध्‍ये झेंडूची फुलशेती यशस्‍वी रित्‍या केली आहे. या फूल शेती बरोबरच अनेक शेती विषयक उपक्रम याठिकाणी राबविण्‍यात येणार आहेत. 

चुनवरे खांबटवाडी या वाडीत पूर्णतः कातळाची जमीन सुध्‍दा असून श्री गावडे व त्‍यांचे पुतणे भालचंद्र अॅग्रो फार्म प्रा.लि. चे संस्‍थापक संतोष गावडे यांनी मातीतूनच नव्‍हे तर दगडातून सोने पिकवता येते हे आपल्‍या कृतीतून यापूर्वीच सिध्‍द केले आहे. आपल्‍या 21 एकर शेत जमिनीत शेती बरोबरच दुग्‍ध व्‍यवसाय, शेळ्यामेंढ्या पालन, गांडूळ खत प्रकल्‍प, शेती पर्यटन आदी प्रकल्‍प त्‍यांनी राबविले आहेत. आपला गाव, शेती सोडून नोकरीच्‍या मागे न लागता कृषि उत्‍पादनाची, हरितक्रांतीची, कृषी पर्यटनाची कास धरल्‍यास निश्चितच आर्थिक स्‍थैर्य लाभू शकते. असे ते नेहमी सांगतात. गावातील शेतक-यांनी आपल्‍या जमिनी कवडीमोल दराने विकण्‍यापेक्षा कंत्राटी शेती पध्‍दतीचा अवलंब केल्‍यास शेतक-यांना त्‍यांच्‍या जमिनीचा मोबदला मिळण्‍याबरोबरच त्‍यांची जमिनही विक्री न होता स्‍व मालकीचीच राहणार आहे. परिसरातील शेतक-यांचे आर्थिक उत्‍पन्‍न वाढविण्‍याबरोबरच बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी उत्‍तम गावडे यांनी ही संकल्‍पना अंमलात आणून त्‍याची कार्यवाही सुरु केली आहे.

चुनवरे येथील माळरानावर कुशे यांची सात एकर पडीक जमीन साफसूफ करुन त्‍यामध्‍ये त्‍यांनी झेंडूचे पीक घेतले आहे. योग्‍य नियोजनामुळे झेंडू पिकाचा बहर त्‍यांना फायदा देऊन गेला आहे. जमिनीचा कस सुधारण्‍याबरोबरच परिसरातील बेरोजगार युवक व युवतींना या शेतीमध्‍ये काम करुन रोजगाराची संधी सुध्‍दा उपलब्‍ध झाली आहे. झेंडूसोबतच मिरची व भुईमूग शेतीही त्‍यांनी केली आहे.

तसेच आडवली येथील विजय घाडीगावकर यांच्‍या मालकीच्‍या 50 एकर जमिनीमध्‍ये करार तत्‍वावर शेतीचा प्रयोग भालचंद्र अॅग्रोकडून करण्‍यात येत आहे. मालोंड चुनवरे परिसरातील इतर शेतक-यांच्‍या जमिनी करार पध्‍दतीनुसार कंत्राटी शेती पध्‍दतीसाठी घेण्‍यात येणार असून त्‍याद्वारे येथील नापीक जमिनीची मशागत होऊन जमिनीचा कस सुधारणार आहे. 

चुनवरे, मालोंड, बेलाचीवाडी परिसरातील शेतकरी स्‍वयंसिध्‍द होण्‍यासाठी गावडे सर्व शेतक-यांना नेहमीच मार्गदर्शन करत असतात. भालचंद्र अॅग्रोच्‍या माध्‍यमातून कै. सावित्री गावडे कृषी एज्‍युकेशन ट्रस्‍ट लवकरच सुरु करण्‍यात येणार असल्‍याची माहिती संतोष गावडे यांनी दिली. या माध्‍यमातून शेती विषयक सर्व मार्गदर्शन व प्रात्‍यक्षिक शेतक-यांना दाखविण्‍यात येणार आहेत. त्‍यांच्‍या या उपक्रमाची दखल जिल्‍ह्याच्‍या कृषी विभागाने सुध्‍दा घेतली असून जिल्‍हा कृषी अधिकारी नरेंद्र वाकडे यांची नुकतीच या ठिकाणी भेट घेऊन कंत्राटी शेतीचा प्रयोग यशस्‍वी केल्‍याबद्दल गावडे यांचे अभिनंदन केले आहे. चुनवरे गावच्‍या माळरानावर हा कंत्राटी शेतीचा प्रयोग पाहण्‍यासाठी केवळ जिल्‍हा भरातूनच नव्‍हे तर संपूर्ण महाराष्‍ट्रातून अनेक कृषी अधिकारी , प्रगतशील शेतकरी नियमित भेट देत आहेत.

शेतकरी मित्रांनो, आज केवळ मनुष्‍यबळाच्‍या अभावाने किंवा आळसाने शेकडो एकर जमीन पडीक राहत आहे. जमिनीत कोणतेही पीक न घेता ती पडीक राहील्‍यास जमिनीचा पोत बिघडतो व जमीन नापीक होण्‍याचा धोका असतो. उत्‍तम गावडे यांचा आदर्श घेऊन जिल्‍ह्यातील पडिक जमिनीत शेतक-यांनी कंत्राटी पध्‍दतीने शेती केल्‍यास आर्थिक लाभाबरोबरच रोजगाराची संधी सुध्‍दा निर्माण होणार आहे.

चुनवरे येथे भालचंद्र अॅग्रोच्‍या माध्‍यमातून राबवलेला कंत्राटी शेतीचा हा यशस्‍वी प्रयोग फायद्याचा एक पर्याय उपलब्‍ध करुन देत आहे. शेतीमध्‍ये नवीन काही तरी करुन दाखविण्‍याची जिद्द बाळगून तुम्‍ही सुध्‍दा ठरु शकता यशस्‍वी शेतकरी. मग करा नियोजन व लागा कामाला.

संध्या गरवारे-प्र जि. मा. अ.सिंधुदुर्ग

No comments:

Post a Comment