Wednesday, 28 May 2014

गतिमान पाणलोट विकास योजना शेतकऱ्यांसाठी वरदान

बुधवार, २८ मे, २०१४



भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. या समस्येची जाणीव ठेवून शासनाद्वारे गतिमान पाणलोट विकास योजना राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील मंडळ कृषी अधिकारी चोपा अंतर्गत मुंडीपार ते तिल्ली येथील तालुक्याच्या ठिकाणापासून 10 कि.मी. अंतरावरील कलपाथरी या गावात ही योजना राबविण्यात आली. गतिमान पाणलोट विकास योजनेअंतर्गत नाला बांधाचे विविध फायदे शेतकऱ्यांना होतात. संरक्षित ओलिताची सोय करणे, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविणे, जनावरांसाठी व पिण्याच्या पाण्याचे दुर्भीक्ष कमी करणे व बागायती क्षेत्रात वाढ करणे हे उद्देश या योजनेचे असून इतर गावांच्या तुलनेत संरक्षित ओलिताची सोय व भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्याच्या दृष्टीने या गावाची निवड करण्यात आली.

या अभियानाअंतर्गत पाणलोट क्षेत्रात 4 बोडी, 3 शेततळे व 2 माती-नाला बांधाचे प्रस्तावित कामे पूर्ण करण्यात आली व या सर्व कामापासून अंदाजे 30 ते 40 हेक्टर क्षेत्रात संरक्षित ओलिताची सोय उपलब्ध झाली आहे. यापैकी मातीनाला बांध 1/18 च्या कामामुळे सर्वात जास्त क्षेत्र संरक्षित ओलिताखाली येत असून आजुबाजूच्या इतर शेतकऱ्यांसाठी या अभियानाचा फायदा झाला.

या नाला बांधामुळे श्री खेतराम ढोरे, श्री विश्वनाथ मेश्राम, श्री छोटेलाल बोपचे, श्री शोभेलाल भोयर व इतर शेतकऱ्यांनी भातपिकाच्या पुर्नलागवडीसाठी पाण्याचा वापर करुन रोवणीचे काम केले. अशाप्रकारे इतर शेतकऱ्यांना या बंधाऱ्यापासून प्रेरणा मिळाली.

या नाला बंधाऱ्याची लांबी 77 मीटर असून पाणी साठवण्याची उंची 2.70 मीटर आहे व बांधाची उंची 4.60 मीटर असून एकूण पाणीसाठा 15.08 टी.सी.एम. एवढा आहे. या बंधाऱ्यापासून जवळ-जवळ 10-12 शेतकऱ्यांना अंदाजे 10 ते 12.50 हेक्टर क्षेत्राला संरक्षित ओलिताची सोय या कामापासून निर्माण झाली आहे. त्याचा प्रत्यय शेतकऱ्यांना वर्ष 2011-12 मधील पावसाने दडी मारल्यावर आला. त्यावेळी शेतकऱ्यांनी बंधाऱ्याचे पाणी लिफ्ट करुन एक-दोन पाण्याशिवाय हातून जाणारे भाताचे पीक वाचवले. त्यामुळे शेतकरी वर्ग आनंदी असून या बंधाऱ्याचे निर्माण कार्य पूर्ण झाल्यामुळे नेहमीकरीता पिकाची हमी शेतकऱ्यांना मिळाली व भातपिकाचे उत्पादन व उत्पादकता वाढीस मदत मिळाली.

एवढेच नाही तर या बंधारामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार असून, जनावरांचासुद्धा चारमाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला.

विशेष म्हणजे उपलब्ध पाणी साठ्याच्या आधारावर रब्बी पिकाच्या क्षेत्रात वाढ होणार असून गहू, हरभरा, पोपटसारखे पिके घेण्यास शेतकरी समोर सरसावले आहेत. या पिकांसोबतच श्री खेतराम ढोरे यांनी भाजीपाला लागवडीचा मनोदय पक्का करुन लागवडीचे काम सुरु केले व त्यासाठी त्यांनी कृषी विभागाकडून डिझेल पंप खरेदी करुन ओलिताची सोय केली. अशाप्रकारे माती-नाला बांध शेतकऱ्यांसाठी फायदयाचे व जीवनमान उंचावण्यासाठी वरदान ठरले आहे.

जिल्हा माहिती कार्यालय, गोंदिया

No comments:

Post a Comment