Thursday, 15 May 2014

सिमेंट बंधारा ठरला वरदान

गुरुवार, १५ मे, २०१४



ज्या भागामध्ये पाण्याचे प्रमाण अत्यल्प आहे अशा भौगोलिक रचनेच्या क्षेत्रात राष्ट्रीय पाणलोट विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमामुळे भूगर्भात पाण्याची साठवणूक करण्यासोबतच वाया जाणारे नाल्याचे पाणी अडवून थेंब न् थेंब पाण्याचा वापर सिंचनासाठी करुन शेतकऱ्यांची पीक उत्पादन क्षमता वाढल्यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत झाली आहे.

गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुका हा दुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो. याच तालुक्यात पांढरवाणी नावाचे गांव. पांढरवाणीत कृषी विभागाच्या वतीने राष्ट्रीय पाणलोट विकास कार्यक्रम राबविला. केवळ राबविलाच नाही तर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सन 2007-08 ते 2011-12 या वर्षात केली. पांढरवाणीचे भौगोलिक क्षेत्र 445 हेक्टर इतके आहे. त्यापैकी लागवडीखाली केवळ 264 हेक्टर जमीन असून 225 हेक्टरवर खरीप हंगामात भात लागवड करण्यात येत होती. इथे पाणलोटचा कार्यक्रम राबविण्यापूर्वी सरासरी तांदळाची उत्पादकता हेक्टरी साडेबारा क्विंटल एवढीच होती.

दामेश्वर फागुजी वैकुटी हे पांढरवाणीच्या शेतकऱ्यांपैकी एक शेतकरी. त्यांच्याकडे दीड हेक्टर शेती. शेती जवळूनच नाला वाहत जातो. मात्र ओलिताची कुठलीही सोय त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांना धान शेतीसाठी पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत होते.

राष्ट्रीय पाणलोट विकास कार्यक्रम सुरु झाल्यामुळे पांढरवाणीच्या दामेश्वर वैकुटीच्या शेतीचे चित्रच बदलले. दामेश्वरच्या शेताजवळून वाहणाऱ्या नाल्यावर कृषी विभागाने या कार्यक्रमाअंतर्गत सिमेंट नाला बंधारा बांधला. त्यामुळे वाहून जाणारे नाल्याचे पाणी अडविल्या गेले. अडविलेल्या पाण्यामुळे सिमेंट बंधाऱ्याच्या परिसरात भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली. आता दामेश्वरला रब्बी हंगामात सुद्धा विविध पिके घेणे शक्य झाले. 

केवळ खरीप हंगामातच धान पीक घेणाऱ्या दामेश्वरला या बंधाऱ्यामुळे दोनदा पिके घेणे शक्य झाले. त्यामुळे त्यांची पीक उत्पादन क्षमता वाढविण्यास मदत झाली. कृषी विभागाच्या मार्गदर्शनामुळे दामेश्वर आता इतर नगदी पिकासह फलोत्पादनाकडे वळला. शतकोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत एक हेक्टर जागेवर आंब्याच्या कलमा लावल्या. सिमेंटनाला बांधण्यात आल्यामुळे धान पिकाला इंजिनच्या सहाय्याने पाणी देता येणे शक्य झाल्यामुळे त्याची संरक्षित सिंचनाची व्यवस्था झाली.

दामेश्वर वैकुटीची धान पिकाचे उत्पादन घेण्याची क्षमता वाढली. बंधारा बांधण्यापूर्वी तांदळाचे हेक्टरी 12 क्विंटल उत्पन्न व्हायचे आता हेक्टरी 15 क्विंटलपर्यंत हे उत्पादन गेले. कृषी विभागाच्या मार्गदर्शनामुळे कमीत कमी खर्च करुन उत्पादन क्षमता वाढविण्यास मदत झाली.

आता तर रब्बीच्या हंगामात हरबरा, गहू आदी पिके दामेश्वर घेत आहे. सिमेंट नाला बंधाऱ्यामुळे पाणी अडविण्यात आल्याने खरीप हंगामात धानाला पुरेसे पाणी देणे शक्य झाल्यामुळे उत्पादन क्षमता तर वाढलीच तसेच रब्बी हंगामात पिके घेण्याची सोय बंधाऱ्यामुळे झाली. पारंपारीक धान पिकच न घेता दामेश्वर गहू, हरबरा, आंबा कलमांची लागवड करुन नगदी पिकाकडे वळला त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत झाली. राष्ट्रीय पाणलोट विकास कार्यक्रमाअंतर्गत सिमेंट नाला बंधारा बांधण्यात आल्यामुळे हा बंधारा दामेश्वर वैकुटीसह इतर शेतकऱ्यांसाठी वरदानच ठरला.

No comments:

Post a Comment