Monday, 19 May 2014

निर्मल भारत अभियानांतर्गत 1345 शौचालयांचे बांधकाम

सोमवार, १९ मे, २०१४



केंद्र व राज्य शासनाद्वारे गावांना स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने निर्मल भारत अभियानाला सुरुवात करण्यात आली. शौचालयाच्या समस्येचे निराकरण म्हणून निर्मल भारत अभियान तसेच महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत अनेक गावांमध्ये वैयक्तिक शौचालय बांधण्यात येत आहेत. या योजनेला नागरिकांनी प्रतिसाद द्यावा या उद्देशाने निर्मल भारत अभियानात काही बदल करण्यात आले आहे.

निर्मल भारत अभियान तसेच मनरेगा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या घरी शौचालय बांधण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत सडक अर्जुनी तहसिल येथील गावांमध्ये म्हणजेच पांढरी, बोपाबोडी, राजगुडा, डव्वा व रेंगेपार/ पांगळी येथे 1345 शौचालयाचे बांधकाम करण्याकरीता निवड करण्यात आली.

निर्मल भारत अभियान व महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे पंचायत समिती गटसंसाधन केंद्र व पाणी व स्वच्छता अंतर्गत राजगुडा ग्रामपंचायत येथील गावांमध्ये गवंडी प्रशिक्षण देण्यात आले. तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देऊन प्रशिक्षणार्थ्यांकडून वैयक्तिक शौचालय बांधून घेण्याचे काम केले जात आहे. जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात आली असून या योजनेचा लाभ लाभार्थी घेत आहेत.

या योजनेचा लाभ घेण्याकरीता लाभार्थी बी.पी.एल., अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ए.पी.एल. असेल तर अल्पभूधारक, भूमीहिन, महिला, कुटुंबप्रमुख, अपंग यापैकी कोणत्याही एका वर्गात मोडणारा असावा. लाभार्थ्याकडे रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.

शौचालय प्रशिक्षण कार्यक्रमात शौचालय बांधकाम स्वच्छतेचे महत्व, निर्मल भारत अभियान व त्याचे महत्व आणि उद्दिष्ट यावर माहिती दिली जाते. कार्यक्रमादरम्यान जनजागृती व लोकसहभागावर भर दिला जातो. त्यामुळे या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सडक अर्जुनी तालुक्यात सुरु झाली आहे. योजनेतील लाभार्थ्यांना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून 4 हजार 500 रुपये व निर्मल भारत अभियानाअंतर्गत 5 हजार 100 रुपये अनुदान मिळणार आहे. त्यातच मिळणारा 900 रुपये लाभार्थी हिस्सा असे एकूण 10 हजार 500 रुपयांचा लाभ मिळणार आहे.

ही योजना राबविण्याकरीता इतर उर्वरित ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. शौचालय बांधून झाल्यावर शौचालयाचा वापर लाभार्थ्यांनी करावा याकरीता शासनामार्फत आता शौचालय बांधण्यावर भर देण्यासाठी प्रत्यक्ष गवंड्यांना प्रशिक्षण देऊन शौचालय उभारण्याची महत्वाकांक्षी योजना नव्या रुपात राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सडक अर्जुनी येथील निवडण्यात आलेल्या 5 गावांमध्ये 67 वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम करण्यात आले आहे. लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ झाल्यामुळे ग्रामीण भागात शौचालयाच्या बांधकामाला गती देण्यात आली आहे.
- पल्लवी धारव, माहिती सहायक, जिल्हा माहिती कार्यालय, गोंदिया

No comments:

Post a Comment