Monday, 5 May 2014

आधुनिक ज्ञानेशाची समूहशेतीची अभिनव गाथा

सोमवार, ०५ मे, २०१४



नाबार्ड अन् ‘आत्मा’च्या साहाय्यानं अभिनव फार्मर्स क्लब 15 ऑगस्ट 2004 साली स्थापन केला गेला. अकरा शेतकऱ्यांच्या या समूह शेतीचं रोपटं आज गगनावरी गेलंय. राष्ट्रीय कृषी वसंत 2014 या प्रदर्शनात या तरूणाईच्या समूहशेतीचं कौतुक झालं. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत पुरस्कार देऊन क्लबच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

नियोजनाच्या माध्यमातून शेती उत्तमरित्या करता येते. ही संकल्पना अभिनव क्लबच्या माध्यमातून समोर येतेयं. अभिनव फार्मर्स क्लब या संकल्पनेची मुहुर्तमेढ पुण्याच्या मुळशी तालुक्यातील माणच्या ज्ञानेश्वर बोडकेंनी रोवली. त्यांच्याकडं वडिलोपार्जित दहा एकर शेती. तरीही आई दुसऱ्यांच्या शेतात राबत. शेतीसाठी कसलंही नियोजन नव्हतं. परंतु वर्तमानपत्रात सांगलीच्या प्रकाश पाटील या शेतकऱ्याची यशोगाथा त्यांनी वाचली. त्यांनी दहा गुंठ्यांच्या ग्रीन हाऊसमध्ये कार्नेशन फुलांच्या विक्रीतून 12 लाखाचं उत्पादन घेतलं होतं. आठवी शिकलेल्या या शेतकऱ्यांच्या कामाचं कौतुक त्यांना वाटलं. जिज्ञासूवृत्तीनं मग सांगली गाठली. शेतीचं तंत्र समजून घेतलं. शेतीसोबतच वेगळ्या पिकांतून पैसे मिळतात, नियोजनानंच शेती उत्तम करता येते, याचा विश्वास आला. अन् शेती करण्यास सुरूवात केली. तीही हायटेक आणि नव्या विचार सोबत घेऊन. 

ज्ञानेश्वर यांचं शिक्षणही केवळ दहावी. परंतु त्यांनी आतापर्यंत यशस्वी शेतकरी म्हणून 32 देशांचा प्रवास केला. पारंपरिक शेती सोडून आजच्या शेतकऱ्याला व्यावसायिक शेती करावी, असा त्यांचा सर्वांनाच सल्ला आहे. क्लबमार्फत दूध, फळांची विक्री केली जाते. तीही मॉल्स, हॉटेल्स, गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये. क्लबमुळे शेतकरी आणि ग्राहकातील दलाल दूर झाला. त्यामुळं शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली. आज क्लबचे 23 हजार शेतकरी शेती करतात. प्रत्येक क्लबबरोबर महिला बचत गट आहेच. एकूण या संकल्पनेतून दोन लाख तरूणांना रोजगार मिळालाय. प्रत्येक सदस्य महिन्याकाठी तीस ते पस्तीस हजार रूपये कमवतोय. बोडकेवाडीचा या शेतकऱ्यासारखेच आज देशात 103 अभिनव फार्मर्स क्लब कार्य करत आहेत. यातून 23 हजार लोकांना स्वयंरोजगार मिळाल्यानं ते शेतकरीही स्वाभिमानानं जीवन जगत आहेत.

ज्ञानेश्वर यांनी 2005-06 साली अल्प पाणी, सिंगल फेज वीज कनेक्शन घेऊन क्लबकडून प्रत्येकी साधारण 10 गुंठे पॉलिहाऊसमध्ये फुलांची लागवड केली. हायटेक शेतीला सुरूवात झाली. पुढं फुलांची मागणी वाढल्यानं परदेशी भाजीपाल्यांची लागवडीचाही त्यांनी विचार प्रत्यक्षात उतरवला. रसायनमुक्त कृषी मालाच्या मार्केटिंगसाठी त्यांनी संघटित महिला शक्तीचा वापर सुरू केला आहे. बचतगटातील 1300 महिला सध्या विक्री व्यवस्थापनाचं काम करतात. त्यांच्यामार्फतच पुण्यात 1800 घरांमध्ये पॅक केलेला भाजीपाला, ताजी फळं, धान्य, कडधान्य, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची थेट विक्री केल्या जाते. नवीन शिकण्याची प्रत्येक शेतकरी सदस्याची इच्छा असते, ते शिकण्यासाठी देश, परदेश दौरेही करतात. क्लबमधील 23 हजार तरूण आज कृषी पदवीचं शिक्षण घेताहेत, ते सुद्धा कृषी व्यवसायासाठीच, असंही ज्ञानेश्वर अभिमानानं सांगतात. या क्लबची दखल जर्मनी, स्पेन आणि केनियातील अभ्यासकांनी घेतली. या समूह शेतीच्या अभिनव कल्पकतेवर वर ते संशोधन करत आहेत. 

अभिनव फार्मर्स क्लबचा यापूर्वीही केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी नाबार्डच्यावतीनं सर्वोच्च शेतकरी मंडळ म्हणून गौरव केला आहे. पुण्याचा कृषीनिष्ठा पुरस्कार, ॲग्रो आयडॉल, शेतकरी पुरस्कारांनही ज्ञानेश्वर यांना सन्मानित करण्यात आलं आहे. सुनियोजन, चिकाटी अन् करण्याची धडपड असल्यास यश निश्चितच मिळतं, हे ज्ञानेश्वर यांनी अभिनव फार्मर्स क्लबच्या माध्यमातून सिद्ध केलंय. देशाच्या शेतकऱ्यांनी हा कित्ता गिरवल्यास त्यांचा विकास होणारच.

-श्याम टरके

No comments:

Post a Comment