Monday, 11 August 2014

बिचुकलेच्या शेतकऱ्यांनी मिटवला कांद्याचा 'वांदा'

सोमवार, ११ ऑगस्ट, २०१४



कांदा म्हटलं की, डोळ्यात अश्रू हे जणू समीकरणच! कधी गगनाला भाव भिडले की हे अश्रू सर्वसामान्यांच्या डोळ्यात तर कधी दर गडगडले की शेतकऱ्यांच्या डोळ्यात! बळीराजा तसा जोमानं कांद्याचं पीक घेत असतो. पण पारंपरिक पद्धतीच्या साठवणुकीमुळे वळीव पावसाची भीती ठरलेली. या सगळ्यावर मात करत कोरेगाव तालुक्यातील बिचुकलेच्या शेतकऱ्यांनी आत्माच्या माध्यमातून कांदाचाळी उभारुन हा नेहमीचा 'वांदा'च मिटवून टाकला आहे.

कांदा हे पीक रुंद वाफे या पद्धतीने घेतले जात होते. तसेच पाणी देताना सोड पाणी पद्धतीने दिले जात होते. खत व्यवस्थापन व कीड रोग व्यवस्थापन देखील योग्य पद्धतीने व योग्य वेळी केले जात नव्हते. तसेच कांदा पिकाचे साठवणुकीसाठी करावयाचे नियोजन देखील केले जात नव्हते. कांदा पीक काढणी नंतर कांदा साठवणुक पारंपरिक पद्धतीने केली जात होती. जसे की कांदा काढणी नंतर लगेच कांदा पात कापली जात असे. तो शेतात झाडाखाली किंवा तसाच शेतात शिग लावून त्यावर ऊस पाचट किंवा वाळलेली कांदा पात टाकून उन्हामध्ये झाकून ठेवला जाई. हा कांदा वळीव पावसामध्ये भिजला की खराब व्हायचा. दुसरी कांदा साठवणुकीची जुनी पद्धत म्हणजे कांदा पिकाची ऐरण लावणे. ही पद्धत जास्त कष्टाची आहे. कारण ह्या पद्धतीमध्ये ऐरण बांधणे, त्यावर ऊस पाचट टाकणे, पावसापासून संरक्षणासाठी प्लास्टीक कागद झाकणे इत्यादी कामे वारंवार दरवर्षी करावी लागत असतात. तसेच या पद्धतीमध्ये देखील कांदा पीक कुजून नुकसान होत असे. या भागातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुधारीत तंत्रज्ञान देण्याविषयी डॉ.अविनाश पोळ, यांनी कृषी विभाग व आत्मा सातारा येथील अधिकाऱ्यांशी चर्चा केली व प्रकल्प मंजुरीसाठी पाठपुरावा केला.

त्यानुसार बिचुकले या गावात कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) तसेच कृषी व पणन विभाग, महाराष्ट्र शासन यांनी राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत कांदा लागवड प्रकल्प राबवला. या प्रकल्पांतर्गत या गावात कांदा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना एकत्रित आणून त्यांचा समूह तयार करण्यात आला व हा प्रकल्प समूह स्वरुपात राबवण्याचे नियोजन करण्यात आले. या प्रकल्पात शेतकरी प्रशिक्षण व शेतकरी अभ्यास दौऱ्याचा समावेश करण्यात आला होता. तसेच कांदा पिकाच्या साठवणुकीसाठी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत जास्तीत जास्त कांदा चाळी उभारण्याचे नियोजन करण्यात आले. 

शेतकरी प्रशिक्षणांतर्गत राहुरी येथील डॉ.दत्तात्रय वने यांचे कांदा लागवड, कीड-रोग व खत व्यवस्थापन व कांदा साठवणूक याबाबतचे प्रशिक्षण आयोजित केले होते. यामधून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती करुन देण्यात आली. कांदा लागवड गादी वाफावर करणे, दोन रोपामधील व ओळी मधील अंतर सारखे ठेवणे, तुषार व ठिबक सिंचनाचा वापर करणे, कीड रोग व्यवस्थापन व खत व्यवस्थापन योग्य वेळी करणे तसेच साठवणुकीसाठी कांदा पिकाचे व्यवस्थापन या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळाले. 

कांदा साठवणुकीसाठी कांदा चाळ करणाऱ्या शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा आयोजित केला होता. हा अभ्यास दौरा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी व कांदा, लसून संशोधन केंद्र, राजगुरुनगर या ठिकाणी आयोजित केला होता. या अभ्यास दौऱ्यामधून शेतकऱ्यांना कांदा चाळ उभारण्याची शास्त्रोक्त माहिती प्राप्त झाली. त्यानुसार या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांनी 10 टन साठवण क्षमतेच्या 2 व 15 टन क्षमतेच्या 4 अशा एकूण 6 कांदा चाळी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत उभारल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा अंदाजे 80 टन कांदा हा चाळींमध्ये साठवला गेला आहे. काही शेतकऱ्यांनी कांदा विक्री केलेला आहे. कांदा चाळीमुळे त्या शेतकऱ्यांना प्रती किलो 16 रुपये फायदा झाला आहे. तसेच शेतकऱ्यांना प्रशिक्षण मिळाल्यामुळे कांदा काढणी, पात कापणीची पद्धत, प्रतवारी, साठवणूक इत्यादी माहिती मिळाली. त्यामुळे कांद्याचे साठवणुकीमध्ये होणारे नुकसान टाळले गेले. 

आता या प्रकल्पाचा पुढील भाग म्हणून शेतकऱ्यांना कांदा पीक काढणी पश्चात तंत्रज्ञान, तसेच कांदा साठवणुकीविषयी विशेष मार्गदर्शन हे कार्यक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. जेणेकरुन शेतकऱ्यांना कांदा या पिकातून जास्त आर्थिक उत्पन्न मिळवता येईल.

हा प्रकल्प राबविताना आत्मा चे प्रकल्प संचालक गणेश घोरपडे यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले. तसेच विकास बंडगर, प्रकाश सुर्यवंशी प्रकल्प उपसंचालक, आत्मा, कृष्णराव धुमाळ, उपविभागीय अधिकारी व तालुका कृषी अधिकारी सुनील साळुंखे यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच कृषी अधिकारी आनंदराव घाटगे, पर्यवेक्षक आर.आर.देशपांडे, कृषी सहायक एच.आर.राऊत, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक नितीन पाटील व विषय विशेषज्ञ प्रदीप सावंत यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन व सहकार्य मिळाले.

या कांदा चाळीविषयी बाळकृष्ण पवार हे म्हणाले, मार्च मध्ये कांदा काढला. त्यावेळी 8 रुपये किलो कांद्याचा दर होता. आता 26 रुपये दर आल्याने मी आता कांदा विक्रीस नेणार आहे. किलोमागे 18 रुपये फायदा झाल्याने कांदा चाळीचा निश्चितच फायदा झाला. आणखी कांद्याचे क्षेत्र वाढवण्याचा माझ्या प्रयत्न आहे.

कांदा काढणीनंतर तो या कांदाचाळीत साठवून, चांगला भाव आल्यावर विक्री करता येणार असल्याने शेतकऱ्यांना निश्चितच मोठे उत्पन्न मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नेहमी रडवणारा कांदा आता चाळीमुळे हसवतोय. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य फुलविण्याचे काम होतंय. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना, प्रशिक्षण आणि मार्गदर्शनामधून शेतकऱ्यांना त्यांचा हरवत जाणारा 'आत्मा' सापडला असंच शेवटी म्हणावं लागेल.

-प्रशांत सातपुते
जिल्हा माहितीअधिकारी, सातारा

No comments:

Post a Comment